परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, आगामी एक वर्षांत ४ हजार शेततळे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली़ परभणी जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे़ तसेच सिंचनाचे प्रश्नही निर्माण होत आहेत़ यावर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे निर्माण केले जाणार आहेत़ प्रत्येक गावामध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात २५० कृषी सहाय्यक असून, प्रत्येक कृषी सहाय्यकाला एक गाव दत्तक दिले आहे़ कृषी सहाय्यकाने दत्तक घेतलेल्या गावात पाचपेक्षा अधिक शेततळे आणि इतर गावांमध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या मोहिमेला शेतकऱ्यांचाही आता चांगला प्रतिसाद मिळत आहे़ आतापर्यंत २५० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, ७८ शेततळ्यांचे काम सध्या सुरू आहे़ एकंदर शेततळ्यांच्या मोहिमेसाठी महसूल, कृषी, पंचायत समिती आणि नरेगा आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत़
शेततळे निर्मितीच्या चळवळीला जिल्ह्यात गती
By admin | Updated: December 23, 2015 23:37 IST