औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी प्रचारातून अलिप्त असल्याचे समोर आले आहे. उमेदवार मधुकर सावंत आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जुन्या राजकारणातून वाद होत असल्यामुळे ते प्रचारात नाहीत, तर काही पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. प्रचारातून अलिप्त राहणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भाजपा उमेदवाराकडून धमकी सत्र सुरू असल्याची चर्चा भाजपाच्या गोटातून पुढे आली आहे. त्या धमक्यांना कुणीही दाद देत नसल्याचे दिसते आहे. सावंत दोन वेळा भाजपाकडून नगरसेवक राहिलेले आहेत. २०१० मध्ये त्यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवीत हॅट्ट्रिक केली.सावंत यांनी २०१० मध्ये बंडखोरी करून माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव राजेंद्र गायकवाड यांना पराभूत केले होते. त्यामुळे गायकवाड यांचा कलही सावंत यांच्या बाजूने सध्या तरी दिसत नाही. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अपक्षच अर्ज भरला होता. मात्र, महायुतीचा काडीमोड झाल्यामुळे त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. भाजपाकडून विजयराज साळवे यांना उमेदवारी हवी होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलले तर उपमहापौर संजय जोशी हे सध्या सावंत यांच्या प्रचारातून अलिप्त आहेत. २००८ सालच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत सावंत यांनी दिलेल्या त्रासामुळे जोशी प्रचारातून अलिप्त असल्याचे भाजपाच्या गोटातून समजले आहे. या प्रकरणी जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उमेदवार सावंत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या स्वीय सहायकाने सांगितले की, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी प्रचारात सहभागी आहेत. निवडणूक असल्यामुळे चुकीची माहिती पेरली जात आहे.
पश्चिम मतदारसंघात भाजपामध्ये गटबाजी
By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST