लातूर : दुष्काळामुळे कोलमडून पडलेल्या ऊसतोड मजुरांना आधार देण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे सरसावल्या असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने चाकूर तालुक्यातील दोन गावे आणि दोन तांडे दत्तक घेतले आहेत. यंदा दुष्काळाची झळ लातूर जिल्ह्याला चांग़लीच बसते आहे. ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहे. कारखाने किती चालतील याचा कसलाच अंदाज अद्याप आलेला नाही. कारखाने चालण्याची शक्यता कमी असल्याने बेकारीची पहिली कुऱ्हाड ऊसतोड मजुरांवर बसणार आहे. रोजंदारीवर पोट असलेल्या या ऊसतोड मजुरांपुढील अडचणींसाठी ऊसतोड मजुरांचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु केलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने चाकूर तालुक्यातील हडोळी, बरमवाडी ही दोन गावे आणि सौंदापूर तांडा व भट्टीखोरी तांडा असे दोन तांडे दत्तक घेण्याचा निर्णय पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केला आहे. दरवर्षी ऊसतोडीसाठी या भागातून ६० टक्क्यांपेक्षा जास्त स्थलांतर होत असतं. कायमस्वरुपी दुष्काळी अशी या गावांची ओळख आहे. या गाव आणि तांड्यावर येत्या कालावधीत पथदर्शी योजना राबविण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे ऊसतोड मजुरांची २ गावे; दोन तांडे दत्तक
By admin | Updated: September 29, 2015 00:44 IST