लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़ कारण अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ लातुरात आठवडाभरात पालेभाज्यांचे भाव जवळपास तिप्पट वाढले आहेत़ परिणामी, किचन बजेट कोलमडले असून मूग, मसूर व तुरीच्या डाळीचेही भाव वाढले आहेत़ भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’ असले तरी ग्राहकांसाठी मात्र ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़दैनंदिन आहारात जीवनावश्यक असलेल्या पालेभाज्यांचे वाढ आठवडाभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे़ भेंडी, दोडका, कारले, बटाटे, कांदे, गवार, पालक, शेपू, मेथी आदी पालेभाज्यांचे दर जवळपास तीन पटीत वाढले आहेत़ आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात १० ते २० रूपये प्रतिकिलो विकणाऱ्या भाज्यांचा भाव सध्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे सुरू आहे़ दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुप्पट वाढ मिळत असली तर प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र तिप्पट वाढीने महागाईचा सामना करावा लागत आहे़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीमार्केट येथे भाजीपाल्याची आवक घटली आहे़ आवक कमी व मागणी जास्त असल्याने दरवाढीचा चटके सुरू झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)बाजारात भाजीपाल्याचे भाव आठवडाभरातच कडाकडले. पंधरा दिवसांपूर्वी १० रूपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे आहेत़ पालक, मेथी, शेपूची जुडी १५ ते २० रुपयांना विक्री होत आहे. शिवाय, वांगे ६० रुपये, बटाटे २० ते ३०, कांदा १० ते २०, गवार ६० ते ८०, ढोबळी मिरची ४० ते ६०, शेवगा शेंग ४० रुपये, चवळी शेंग ६० ते ७० रुपये, कोबी ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, दुधी भोपळा ३० ते ४०, काकडी ३० ते ४० रुपये किलो असे दर आहेत. १५ दिवसांपूर्वी बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये किलोप्रमाणे मिळत होत्या. भाजीपाल्याची किरकोळ विक्रीही चढ्या दराने केली जात आहे.
उत्पादकांना अच्छे दिन !
By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST