बदनापूर : तालुक्यातील पाडळी येथील पाणीप्रश्न कायमचा मिटावा याकरीता ठाणे येथील एका उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नाचे पैसे देणगी म्हणून दिले आहेत.तालुक्यातील पाडळी गावाला दरवर्षी पिण्याची पाणीटंचाई जाणवते. यावर प्रशासनाने अद्याप कायमस्वरूपी पर्याय काढला नसला तरी ठाणे येथील उद्योगपती डॉ. विवेक वडके व त्यांच्या पत्नी वासंतीताई यांनी आपल्या मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने केले. त्यामधील बचतीचे तीन लाख रुपये पाडळी गावाच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दिले. यावेळी डॉ. वडके यांनी या गावाच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करण्यास सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दिले. यावेळी विनय काकडे यांनी हे गाव तालुक्यात आदर्श गाव करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सुहास पोहनेरकर, परेश रुणवाल, मकरंद चांदोडकर, मनोज पित्ती, कमलेश कुकडेजा, संतोष गिल्डा, लक्ष्मीकांत खंडेलवाल, सरपंच सत्यशिला सिरसाट, उपसरपंच स्वाती शेळके, ग्रा.पं सदस्य तातेराव सिरसाट, सविता शेळके, कुशवर्ता कांबळे, भगवानराव शेळके व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा सिरसाट, सूत्रसंचालन अनिल शेळके यांनी, तर आभार प्रदर्शन रामेश्वर सिरसाट यांनी केले. डॉ. विवेक वडेक यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. (वार्ताहर)
मुलीच्या लग्नाचे पैसे दिले पाण्यासाठी..!
By admin | Updated: February 2, 2016 00:24 IST