औरंगाबाद : विशेष सभा घेण्याचे प्रयत्न असफल झाल्यानंतर आता जूनअखेरीस जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने या सभेची तारीख निश्चित करण्यासाठी अध्यक्षांकडे नुकतीच संचिका पाठविली आहे. शासनाकडून मिळालेला ४८ कोटी रुपयांचा निधी आणि ठेवींवरील व्याजापोटी मिळालेले ८ कोटी अशा ५६ कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाचे नियोजन या सभेत होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेला शासनाकडून ४८ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. तसेच मार्चनंतर बँकेतील ठेवींवरील व्याजापोटीही जिल्हा परिषदेला ८ कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे. या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी जि.प.चे पदाधिकारी आणि सदस्य सुरुवातीपासून आग्रही आहेत. त्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणीही काही सदस्यांनी महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली होती. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर आता जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा लवकरच म्हणजे चालू महिन्यात घेण्याचे प्रयत्न सदस्यांकडून सुरू आहेत. सामान्य प्रशासन विभागाने या सभेची तारीख घेण्यासाठी नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष शारदा जारवाल यांच्याकडे संचिका पाठविली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता संपताच म्हणजे २४ जूननंतर लगेचच ही सभा घेण्यात येण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पदाधिकारी, सदस्यांची घालमेलमार्च २0१३ पूर्वी शासनाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. जि.प. अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ६0 कोटींहून अधिक रक्कम पडून असल्याचे उघड झाले होते.मागील चार महिन्यांपासून जि.प. सदस्य आणि पदाधिकारी निधी खर्च व्हावा, या मागणीसाठी प्रशासनाकडे बराच पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत शासकीय निधीवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा सदस्यांना आहे.
महिनाअखेरीस सर्वसाधारण सभा
By admin | Updated: June 9, 2014 01:06 IST