गेवराई: शहरात पाच ते सहा तास भारनियमन केले जाते. यामुळे उकाड्यासह इतर अनेक संकटांना गेवराईकरांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्यावेळी वीज गायब होते. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात चाचपडत काढावी लागते.पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने वातावरणात उष्णता वाढलेली आहे. उष्णतेपासून संरक्षण व्हावे, यासाठी महिला, मुले, वृद्ध व नागरिक विजेवरील उपकरणे पंखा, कूलर, एसी आदी सुरू करून घरामध्ये बसतात. असे असले तरी शहरात दुपारच्या वेळी व सायंकाळीही भारनियमन केले जाते. त्यामुळे विद्युत उपकरणाचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. ही उपकरणे बंद असल्याने नागरिकांना उकाड्यात बसावे लागते. गेवराईत दोन टप्प्यात भारनियमन होत असून याचा फटका व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कधी-कधी पाच ते सहा तासांपेक्षा अधिक वेळ वीज नसते. यामुळे हॉटेल, रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, झेरॉक्स सेंटर, कांडण यंत्र आदी छोट्या व्यावसायिकांचे उद्योग बंद पडतात. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे गेवराई शहरातील भारनियमन बंद करण्याची मागणी मनोज जैस्वाल, उमेश मानधने, रामेश्वर पाटेकर, महावीर मडकर आदींनी केली आहे. या संदर्भात महावितरणचे उपअभियंता सारडा म्हणाले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार भारनियमन करण्यात येत आहे. (वार्ताहर)उकाड्याने जनता मेटाकुटीसगेवराई शहरात पाच ते सहा तास केले जाते भारनियमन.भारनियमनामुळे विद्युत उपकरणे बंद असल्याने नागरिकांना सहन करावा लागतो उकाड्याचा त्रास.भारनियमनाचा छोट्या व्यावसायिकांनाही बसतो फटका.
भारनियमनामुळे गेवराईकर त्रस्त
By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST