परळी : शहरातील उड्डाणपूलावरुन उतरताच सुभाष चौक रोडकडे निघालेल्या नागरिकांना व दुचाकीधारकांना सामना करावा लागतो तो खांडे पूल, भाजी मार्केटसमोरील अस्वच्छतेचा. या परिसरात नाल्यावरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. परळी नगर परिषदेने खांडी पूल नाल्यावर व्यापारी संकुल व भाजी मार्केट काढले आहे. या भाजी मार्केट समोरील पुलाजवळ नियमितपणे कचऱ्याचा ढिग आढळून येतो. या भागातून थर्मलकडे व थर्मलकडून परळी शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या भागात स्वच्छता करावी, अशी मागणी माजी नगरसेवक ज्ञानोबा आघाव, सामाजिक कार्यकर्ते नीलेश जगतकर, सोमनाथ गडेकर, साईनाथ मस्के यांनी केली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग असल्याने दर्शनासाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असल्याने शहरात स्वच्छता ठेवली पाहिजे. असे झाले तरच परळीचे नाव दुसऱ्या राज्यातही चांगले व स्वच्छ शहर म्हणून काढले जाईल. गंगाखेड-बीड या मार्गाने येणारे भक्त परळीत उड्डाणपूल, खांडी पूलावरून येतात. त्यांना घाणीचा सामना करतच शहरात यावे लागते. खांडी पूल नाल्यावर घाण व कचरा फेकण्यात येत आहे. समोरच भाजी विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे त्यांना याचा नेहमीच सामना करावा लागतो.गल्लोगल्लीत स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ करण्यात येईल, असे न.प.ने सांगितले. (वार्ताहर)
भाजीच्या दुकानांसमोरच कचऱ्याचे ढिगारे
By admin | Updated: December 5, 2014 00:53 IST