व्यंकटेश वैष्णव , बीडदु:खी, पीडित लोक देवाकडे न्यायाची याचना करतात;परंतु जिल्ह्यातील बहुतांश देवस्थानांच्या मालमत्ता धनदांडग्यांनीच गिळंकृत केल्या असून देवदैवतांनाच घेरले आहे. नियमबाह्य मालकी रद्द करुन मालमत्ता पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचे न्यायालयाचे आदेश डावलण्याचे धाडसही काहींनी केले आहे. मार्च २०१५ पासून कारवाईच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. दांडगाई करणाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच वरदहस्त असल्याने ‘अरे देवा’ म्हणण्याची वेळ आली आहे.देवस्थानांच्या जमिनीच्या वादासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. महाराष्ट्र शासनाने ३० जुलै २०१० दरम्यान देवस्थानच्या जमिनींची तपासणी तसेच बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या असतील तर तपासणी करून देवस्थानच्या नावे कराव्यात असा आदेश दिलेला आहे. याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत काय कारवाई केली आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असे ९ महिन्यापूर्वी लेखी पत्राद्वारे सांगितले आहे. मात्र याबाबत उपविभागीय कार्यालयाने कुठलीच पावले उचलेली नाहीत.देवस्थानांच्या जमिनी बळकावणाऱ्यांमध्ये बहुतांश जण प्रतिष्ठित आहेत. अनेकांनी प्रतिष्ठेच्या जोरावरच देवदेवतांनाही अक्षरश: ‘मामा’ बनवले आहे. अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या जमिनी अनाधिकृतरित्या वहिती केल्या जात आहेत. काहींनी ‘लक्ष्मीदर्शन’ घडवून मालमत्तेवर आपले बस्तान बसविले आहे. देवस्थानच्या मालमत्ता लुटणाऱ्यांचे पेव फुटलेले असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. जिल्हयात हजारो एकर जमीन देवस्थानाची आहे. याची नोंद धर्मदाय आयुक्त कार्यालयात करणे बंधनकारक आहे. मात्र जमिनी लाटण्यासाठी देवस्थानच्या जमिनीच्या नोंदी न्यास कार्यालयात करत नाहीत. तहसिलदार व तलाठी यांना हाताशी धरून अशा अनेक देवस्थानाच्या जमिनी धनधांडग्यांनी लाटल्या आहेत. व याबाबतचे रेकॉर्डच कार्यालयातून गहाळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत प्रशासन गंभीर नाही. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.
देवस्थानांमध्येही दांडगाई !
By admin | Updated: December 8, 2015 00:08 IST