कळंब : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांनी अखेर सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले़ वेळोवेळी सूचविलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याने या सदस्यांनी हे राजीनामे दिले असून, यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे़शहरातील पाणीप्रश्न सध्या गंभीर बनला आहे. नागरिकांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो़ पालिकेतील पाणीपुरवठा समितीने चार दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. नगर पालिका प्रशासन तुघलकी कारभार हाकीत असल्याचा आरोप करीत समितीचे सदस्य नगरसेवक पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा, छायाताई आष्टेकर यांनी सोमवारी मुख्याधिकारी संजय बोंदर यांच्याकडे संयुक्त पत्रान्वये राजीनामे सादर केले. सत्ताधारी काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेही पाणीप्रश्नी राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत़
पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांचे राजीनामे
By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST