परभणी : शहर महानगरपालिकेने नागरिकांची वर्षभराची नळपट्टी माफ करावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अॅड़ राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे़ मुबलक पाणी असताना गेल्या दहा महिन्यांपासून नागरिकांना १२ ते १४ दिवसांना वेळी अवेळी पाणीपुरवठा होत आहे़ केवळ मनपाचे नियोजन नसल्याने शहरवासियांना हा त्रास सहन करावा लागत आहे़ पाणीपुरवठा योजनेवर २००८ साली विद्युत पंप लावण्यात आले़ परंतु, या पंपांची दुरुस्ती करण्यासाठी मनपाकडे एकही तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाही़ याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे़ शहरातील जलकुंभ भरले तरीही खाजगी पाणी वाटप करणारे या ठिकाणाहून पाणी घेऊन जातात़ त्यामुळेही पाण्याचा अपव्यय होत आहे़ मनपाच्या नियोजन शून्य धोरणामुळे नागरिकांना १० ते १३ दिवसांना पाणी पुरवठा होऊनही नळपट्टी मात्र एक महिन्याची वसूल केली जात आहे़ तसेच उशिरा नळपट्टी भरणाऱ्यांवर व्याजही लावले जात आहे़ याप्रश्नी राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन एक वर्षाची नळपट्टी माफ करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे़ (प्रतिनिधी)
‘वर्षभराची नळपट्टी माफ करा’
By admin | Updated: July 13, 2014 00:22 IST