शिरूर कासार : तलावाचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही त्यातून मासे का काढतात या कारणावरून चौघांवर २० ते २५ जणांनी सशस्त्र हल्ला केला. ही घटना शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथे गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. हिरामन दगडू बळे, रघुनाथ मोतीराम बळे, बाबू रामा बळे, दगडू मोती बळे अशी जखमींची नावे आहेत. शिरूर कासार येथील प्रकल्पातून मासे काढण्यावरून वाद आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास चौघे मासे काढत असल्याचे काही लोकांना दिसून आले. त्यांनी याची माहिती इतरांना कळविली. मासे का काढतात ? अशी विचारणा करीत २० ते २५ जणांनी त्यांच्यावर तलवार, लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. (वार्ताहर)
मासेमारीवरून सशस्त्र हल्ला
By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST