केज : तालुक्यातील चंदनसावरगाव येथे रविवारी शेतवस्तीवर रणरणत्या उन्हात अग्नितांडव निर्माण झाले. एका गोठ्यासह कडब्याच्या तीन गंजी भस्मसात झाल्या. दोन म्हशी भाजल्या आहेत. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास श्रीकिसन तपसे यांच्या गोठ्याने पेट घेतला. गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्याची आगीत राख झाली. गोठ्यात दोन म्हशी बांधलेल्या होत्या. आगीचे लोट त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्या भाजल्या आहेत. त्यानंतर आग लगत असलेल्या कडब्याच्या गंजीजवळ गेली. बाबासाहेब तपसे व पांडुरंग तपसे यांच्या गंजींनाही आगीने कवेत घेतले. यावेळी कापसाच्या पळाट्या व भुसकटही जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावधाव केली; पण आगीच्या ज्वाला इतक्या वेगाने फैलावत होत्या की, नागरिकांचे प्रयत्न अपुरे ठरले. अंबाजोगाई पालिकेचा बंब घटनास्थळी पोहोचल्यावर तासाभराच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. जेथे आग लागली तेथे २५ घरांची वस्ती आहे; आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी एम. ए. सोनवणे, तलाठी एस. एल. कराड, पशूधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा राऊत यांनी भेट दिली. डॉ. राऊत यांनी म्हशींची तपासणी करुन उपचार केले. (वार्ताहर) लग्नकार्यावर सावट श्रीकिसन तपसे यांचे गावात घर असून शेतात गोठा आहे. पाणीटंचाईमुळे ते गेल्या काही दिवसांपूर्वी शेतात राहण्यासाठी गेले. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा सोमवारी आहे. रविवारपासूनच नातेवाईकांची रेलचेल होती. राहत्या घरापासून जवळच असलेल्या गोठ्याने पेट घेतला. त्यामुळे नातेवाईकांची धांदल उडाली. कन्येच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच आगीने तांडव निर्माण केले. त्यामुळे लग्नसोहळ्यावरही दु:खाचे सावट निर्माण झाले आहे.
चंदन सावरगावात आगीचे तांडव
By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST