संजय खाकरे , परळीविक्रमी ऊस गाळपामुळे नावाजल्या गेलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता गाजविण्यासाठी बहीण-भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सत्ता राखण्याचे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढे आहे तर अस्तित्व सिद्ध करण्याचे कसब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दाखवावे लागणार आहे.स्व. गोपीनाथ मुंडे यांनी युती सरकारच्या काळात वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. १६ वर्षांपासून कारखान्यावर मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेली संचालक मंडळाची निवडणूक गाजू लागली आहे. २१ संचालक पदांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे व कार्यकारी संचालक डी. डी. कुलकर्णी यांच्यात ठिणगी पडली. त्याचे रूपांतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात झाले. त्यामुळे ही निवडणूक अधिकच संवेदनशील बनली आहे.दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्यावरील निर्विवाद वर्चस्वाला धक्का पोहचू नये यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे यांनी व्यूहरचना आखली आहे. दुसरीकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विद्यमान संचालक मंडळाला हादरा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे स्वतंत्र पॅनल आखाड्यात उतरविण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास निवडणुकीत आणखीच रंग भरणार आहेत.तथापि, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे कारखाना निवडणुकीत आमनेसामने आल्यामुळे तिसऱ्या पॅनलची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मुंडे विरूध्द मुंडे अशा सरळ लढतीची चिन्हे आहेत. जोरदार चुरसवैद्यनाथ कारखान्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा एकछत्री अंमल राहिलेला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कारखान्यातील राजकारण जवळून अनुभवलेले आहे. इकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी एकेकाळी कारखान्यावर हुकूमत गाजवलेली आहे. ते कधी महत्त्वाच्या पदावर नव्हते परंतु कारखाना प्रशासनावर वचक होता. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.२१ संचालकांच्या निवडणुकीत ८ हजार ४१२ इतके मतदार मतदान करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे. ३० मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून, १ ते १५ एप्रिल दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.तीन दिवसांत १६६ अर्जांची विक्री४बुधवारी संचालक पदाच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी ९६ अर्जांची विक्री झाली. तीन दिवसांत आतापर्यंत १६६ अर्ज विक्री झाले आहेत. केवळ पंडितराव मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे
कारखान्यासाठी बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला
By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST