पारगाव : पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह या भागात पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने परिसरातील सव्वाशेवर जनावरे बीड जिल्ह्यात नेण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या भागात दोन संस्थांच्या छावण्यांना मंजुरी दिल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. यातील एका छावणीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. चार टंचाईवर मात करण्यासाठी वाशी तालुक्यातील विविध ठिकाणच्या बारा संस्थांनी चारा छावणीसाठीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले होते. यातील काहींमध्ये त्रुटी आढळून आल्या. तर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. यात पारगाव सर्कलमधील दोन प्रस्तावांचाही समावेश होता. मात्र, एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने जनावरांचे स्थलांतर कण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. दरम्यान, दीपशोभा सेवाभावी संस्थेच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांना मान्यता दिल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी पारगाव येथील खंडोबा मंदिराच्या मागे या छावणीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे माजी सदस्य महादेव आखाडे, माजी सरपंच डी. एन. मोटे, डॉ. शेखर कोकणे, डॉ. एस.डी. कुलकर्णी यांच्यासह छावणीसाठी पुढाकार घेतलेले बाबा हारे, बाबासाहेब गाढवे, प्रकाश मोेटे, विकास तळेकर, अशोक जाधव, लक्ष्मीकांत आटुळे, लहुदास चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी व पशुपालक आपल्या पशुधनासह उपस्थित होते.(वार्ताहर)
...अखेर चारा छावणी सुरू
By admin | Updated: December 7, 2015 00:58 IST