- संतोष हिरेमठऔरंगाबाद : तारीख १५ मार्च २०२०....औरंगाबादकर ही तारीख कधीही विसरू शकणार नाही. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादेत याच दिवशी कोरोनाने शिरकाव केला. या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेली. वर्षभराच्या ३६५ दिवसांत एक ते तब्बल ५६ हजार रुग्णांपर्यंत जिल्ह्याने मजल गाठली, तर तेराशेवर लोकांचा दुर्दैवाने बळी गेला. वर्षपूर्ती होत आहे, पण कोरोना महामारीचे संकट अजूनही दूर झालेले नाही. डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचा दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करून त्याविरुद्ध लढा सुरूच आहे.
शहरात गतवर्षी १५ मार्च रोजीच एका खासगी रुग्णालयात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल या दिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ६०० लोकांची तपासणी केली, परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिल, २०२० पासून दररोज नवे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यात अजूनही खंड पडलेला नाही. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबर काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही बळी गेला, पण आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, रुग्णसेवेत आजही एक पाऊल पुढे आहेत.
आक्टोबर ते जानेवारीदरम्यान रुग्णसंख्या कमी राहिल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीती काहीशी संपली, पण फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. प्रशासनाच्या मदतीने आराेग्य उपसंचालक डाॅ.स्वप्निल लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुधाकर शेळके, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.
घाटीत कोरोना तपासणीची सुविधाघाटीत २९ मार्च, २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि शहरातच कोरोनाची तपासणीची सुविधा सुरू झाली. यासाठी अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर, सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ.ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले. त्यापूर्वी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. कोरोना तपासणीसह गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी घाटीतील डाॅक्टर्स, परिचारिका महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.
तब्बल १८० दिवस रोज मृत्यूजिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर, १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत गेले. जिल्ह्यात तब्बल १८० दिवसांनंतर म्हणजे ६ महिन्यांनंतर कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्युसत्राला ८ नोव्हेंबर रोजी ब्रेक लागला. त्यानंतर, काही दिवस मृत्यूचे प्रमाण घटले, परंतु आता पुन्हा एकदा रोज मृत्यू होत आहे.
मास्कची साथ कधीही सोडली नाहीमी कोरोनाबाधित आढळले, पण सुदैवाने माझ्या संपर्कातील कोणीही बाधित आढळले नाही. मला माझ्या डाॅक्टर मुलाचा मोठा आधार मिळाला. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी नियमित कामकाज सुरू केले. मास्क लावल्यावर अनेक सहकारी ‘मास्क का लावता, काही होत नाही’ म्हणून खिल्ली उडवत असत, पण मी कधीही मास्क वापरणे साेडले नाही. मी लसही घेतली आहे. आज वर्षभरानंतरही कोरोनाची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही गांभीर्य कळले नाही, असे वाटते. नागिरकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. जबाबदारी पार पडली पाहिजे.- डाॅ.मीना सिन्हा, शहरातील पहिल्या कोरोना रुग्ण
त्रिसूत्रीचे पालन करावेप्रारंभी उपचारासंदर्भात गाइडलाइन नव्हत्या. त्यावेळी आम्ही पहिल्या रुग्णावर उपचार केले. आजही रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आजही महत्त्वपूर्ण आहे.- डाॅ.हिमांशू गुप्ता, प्रशासक, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल
यशस्वी उपचारपहिला रुग्ण आढळला, त्यावेळी उपचारपद्धती स्पष्ट नव्हत्या. त्यामुळे थोडी भीती होती, पण रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्यावेळी रुग्ण लवकर गंभीर होत असे. चालत येणारा रुग्ण गंभीर होत असे, परंतु आता तसे राहिलेले नाही.- डाॅ.वरुण गवळी, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, पहिल्या रुग्णावर उपचार करणारे डाॅक्टर
जिल्ह्यातील वर्षभरातील कोरोनाची परिस्थितीमहिना - रुग्ण - मृत्यूमार्च २०२० - १ -०एप्रिल २०२० - १७९ -७मे २०२० - १,३६४ -६६जून २०२० - ४,१२९ -१८५जुलै २०२० - ६,९०० -२१८ऑगस्ट २०२० - ११,१६२ -२१६सप्टेंबर २०२० - १०,९५९ -२४६ऑक्टोबर २०२० - ५,६६८ -१४४नोव्हेंबर २०२० - २,९९३ -६७डिसेंबर २०२० - २,२४९ -५६जानेवारी २०२१ - १,३ ८३ - ३३फेब्रुवारी २०२१ - ३,३७९ -३०मार्च २०२१ - ६,३१२ -६६
कोरोनाचे एकूण रुग्ण- ५६,६७८बरे झालेले रुग्ण- ५१,०१७एकूण कोरोना बळी- १,३३४सध्या उपचार सुरू असलेले- ४,३२७