बीड :माजलगाव येथील धरणात मासेमारी करुन उदरनिर्वाह करणार्या मच्छीमारांनी न्याय- हक्कासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह जाळे लावून उपोषण केले़ यावेळी संतप्त मच्छीमारांनी रोजीरोटी हिसकावून घ्याल तर महागात पडेल असा सज्जड इशारा तर दिलाच शिवाय न्यायासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी दर्शवली़ माजलगाव धरणाचे क्षेत्र ७ हजार ८९४ इतके आहे़ या धरणावर सावरगाव, शेलापूरी, मंगरुळ, नाथापूर, लिमगाव, सांडस चिंचोली, परडी माटेगाव, लऊळ, ढोरगाव, पुरुषोत्तमपूरी, गुंजमूर्ती, फूलेपिंपपळगाव, ढेपेगाव, नागडगाव, एकदरा, जवळा, बोरगाव आदी गावांतील दहा हजार मच्छीमार मासेमारी करुन आपल्या संसाराचा गाडा हाकतात़ मात्र, एका संस्थेकडे मासेमारीचा ठेका देऊन प्रशासनाने मच्छीमारांना वार्यावर सोडले आहे़ विशेष म्हणजे ज्या संस्थेला ठेका मिळाला आहे, त्यांना एक वर्षाचा ठेका विनामूल्य वाढविण्यात आला आहे़ तो रद्द करावा, तलावावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे़ आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ़ उद्धव नाईकनवरे यांनी मच्छीमारांचा प्रश्न हाती घेतला़ त्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाचशेवर मच्छीमार कुटुंबियांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले़ यावेळी डोक्यावर पांढर्या टोप्या घालून आंदोलनकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला़ यावेळी मानवी हक्क अभियानचे अशोक तांगडे, चाईल्ड लाईनचे तत्वशील कांबळे, लोकशासनचे विशाल कदम यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला़ त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन दिले़ जिल्हाधिकार्यांनी संबंधित संस्थेला दिलेला एक वर्षाचा वाढीव ठेका रद्द करण्यासंदर्भातील अहवाल देणार असल्याचे सांगितले़ महादेव कचरे, भारत घटे, कुसुम लकारे, कमलबाई पल्लारे, राहीबाई घटे, देवचंद्र कचरे, सखाराम कचरे, गंगाधर धुंगासे, सखाराम लकारे, परमेश्वर घटे, चंद्रकला कचरे, नंदा बिजूले, तुकाराम कुटारे, वनमाला धनूरे, सविता घटे, महानंदा घटे, खंडू गिरुते, मालनबाई लुचाटे, राधा लुचारे, विश्वनाथ कुटरे, गणेश परसे यांच्यासह शेकडो मच्छीमार उपस्थित होते़ शेवटपर्यंत लढा मच्छीमारांचे संसार मासेमारीवर अवलंबून आहेत़ ठेकेदाराने त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे, असा आरोप आव्हान संघटनेचे डॉ़ उद्धव नाईकनवरे यांनी केला़ राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न सुरु आहे़ मात्र, जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरीही मागे हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले़ शेवटच्या श्वासापर्यंत मच्छीमारांसाठी लढा देऊ असेही ते म्हणाले़ चार आंदोलनकर्ते रूग्णालयात मंगळवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविले. (प्रतिनिधी)
मच्छीमारांचे जाळे लावून उपोषण
By admin | Updated: May 28, 2014 00:21 IST