माजलगाव: गारपिटीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये भेदभाव केल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सावरगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.गारपिटीत ज्वारी, गहू, हरभरा, ऊस या पिकांसह डाळिंब, मोसंबी, द्राक्ष आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले होते. येथील तलाठी सोपान वाघमारे यांनी पंचनामे करताना भेदभाव केल्यामुळे सुमारे चारशे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. फेरपंचनामे करून अनुदानाचे वाटप करावे, या मागणीसाठी आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ. उद्धव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली रवि नाईकनवरे, अभिमान नाईकनवरे, रामभाऊ जगताप, अजिंक्य जगताप, रामदास महात्मे, नारायण शेंडगे, आबा बोराडे, सतीश नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे आदी शेतकरी उपोषणास बसले. तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST