नांदेड: सणासुदीच्या काळात होणारी भेसळखोरी रोखण्यासाठी शहरातील मिठाईघरांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे़ शिवाय गणेशोत्सव काळात होणाऱ्या भंडारा कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाचा तात्पूरता परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे़ गौरी, गणपती, दुर्गा महोत्सव आदी सण एकापाठोपाठ आले आहेत़ या काळात मिष्ठान्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते़ दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत़ अशावेळी भेसळखोरी होण्याची शक्यता असते़ यामुळे विषबाधासारखे अप्रिय प्रकार घडू नयेत म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे़ नांदेड शहरात लहान-मोठे ३० पेक्षा जास्त मिठाईघर आहेत़ येथे बनविण्यात येणारे विविध पदार्थ स्वच्छ वातावरणात बनविण्यात येत आहेत अथवा नाही, कामगार-मजुरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे यासह दुग्धजन्य पदार्थांची अधिक वेळ साठवणूक न करता प्राधान्यक्रमाने विक्री करणे गरजेचे असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी दिली़ मिष्ठान्न दुकानातील नमुने सदोष आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
शहरातील मिठाईघरांची एफडीएकडून तपासणी
By admin | Updated: August 24, 2014 01:15 IST