खुलताबाद : शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दर सातव्या दिवशी पाणीपुरवठा नगर परिषदेकडून केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयासमोर नागरिकांनी उपोषण केले.खुलताबादेत मागील अनेक महिन्यांपासून नगर परिषदेतर्फे कधी पाचव्या, तर कधी सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने पाणीटंचाईची उपाययोजना करून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, यासाठी अमिनोद्दीन सुलतान मियॉ, माजी नगरसेवक निसारखॉन सरदारखॉन पठाण, मसियोद्दीन अहेमोद्दीन, मोहंमद इसाक इनामदार, कलीमोद्दीन खुदबोद्दीन, अब्बास बेग, अन्वर मोईनोद्दीन, इकबाल गणी पटेल, सय्यद अन्वर अली, सय्यद इसाकोद्दीन, मसीयोद्दीन शरफोद्दीन, इलियास काचवाले, कलीम खुदबोद्दीन, अमीन टेलर आदींनी सोमवारी खुलताबाद नगर परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनास शहरातील नागरिकांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.शहराला पाणीपुरवठा करणारा येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. सध्या मध्यम प्रकल्पातील तीन विहिरीतील पाणी एकत्र करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या विहिरीत आडवे, उभे बोअर घेण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये प्रकल्पात २० बाय १० चे चर खोदण्यात येईल. यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चर खोदण्यामुळे शहराला पाण्याचा फायदा होईल, असे मुख्याधिकारी सविता हारकर म्हणाल्या.
पाण्यासाठी उपोषण
By admin | Updated: March 31, 2015 00:41 IST