उस्मानाबाद : आधारभूत हमीभाव केंद्रावर धान्य दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. सदर रक्कम नाफेडने पर्यायाने केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यायची होती. मात्र केंद्राकडून पैसा न आल्याने अखेर शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळणार आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटींग फेडरेशनमार्फत नाफेडला तूर ३०, ४४१.५० क्विंटल, हरभरा ७५.२८९ क्विंटल दिला होता. त्याची देय रक्कम ३६ कोटी ४२ लाख ९४ हजार ३५० रुपये एवढी होती. त्यातील २५ कोटी ३३ लाख ६३ हजार ३४६ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र ११ कोटी ९ लाख ३७ हजार रुपये अद्यापही थकीत होते. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी नाफेडकडून शेतमालाची रक्कम उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र शासनाने याबाबत पुढाकार घेण्याची विनंती राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. या अनुषंगाने ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. थकीत पैसे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभा करावयाच्या ५० कोटीच्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार उपलब्ध झालेल्या हमीचा वापर करुन ५० कोटीचे कर्ज उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट को आॅप. फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने अदा करण्याची मागणी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी संपर्कमंत्री दिलीप सोपल यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे थकित पैसे मिळणार
By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST