चापोली : जमिनीची सुपिकता वाढवून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहे़ यासाठी शेणखत तर काही शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्या बसवत आहे़रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे़ जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जातोय़ दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे़ महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याची वेळ आली आहे़ आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळला आहे़ आज शेतकरी परंपरागत पद्धतीकडे वळत आहे़ शेतात शेणखताचा वापर वाढत आहे़ तसेच शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याचे प्रमाणही वाढत आहे़ या मोबदल्यात मेंढपाळांना जेवण व धान्य शेतकरी देत असतो़ अत्यल्प खर्चात जमिनीची सुपीकता वाढत आहे़ त्यामुळे शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र चापोली परिसरात दिसून येत आहे़त्यामुळे शेतीची सुपीकता वाढणार, हे मात्र निश्चित खात्री असल्यामुळे शेतकऱ्यातून या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे़ (वार्ताहर)
शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय
By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST