परंडा : सीना-कोळेगाव धरणावर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप करीत धरणाचे पाणी तात्काळ कालव्यात सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी सीना-कोळेगाव विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असून पाण्याची पातळी खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका उन्हाळी हंगामातील पिकांना बसणार असल्याने विधान परिषदेचे आ. प्रा. तानाजी सावंत यांनी सीना-कोळगाव धरणावर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याबाबत विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागाकडून योजना तात्काळ सुरु करण्याचे आश्वासन दण्यात आले. मात्र, योजना सुरु करण्याबाबत कुठल्याही हालचाली होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सीना-कोळेगाव धरणातील पाणी कालव्यातून सोडण्यासोबतच कॅनलमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनामध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद तळेकर, शंकर घोगरे, भूम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, भाऊसाहेब मुंडे, दिलीप मोरजकर, अप्पा महानवर, मनसे तालुकाध्यक्ष नानासाहेब पडघन, निखील महानवर, बबन रधवे, सारंग घोगरे, जयराम कदम, आकाश साणवने, शब्बीर पटेल, लक्ष्मण घोगरे, अक्षय तिंबोळे, अक्षय रधवे, ब्रम्हदेव तिंबोळे, सह कंडारी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होतो. धरणे आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी या आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती. तरीही कार्यकारी अभियंता या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलकांमधून संताप व्यक्त होत होता. (वार्ताहर)
धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By admin | Updated: April 4, 2017 23:20 IST