लातूर : उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आहे. आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी ऊस जगवून कारखान्यांना देत आहेत. मात्र कारखाने एफआरपीप्रमाणे भाव देत नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली साखर संघाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र त्यांना व दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी डांबून ठेवले. न्याय मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी डांबून ठेवले. ही बाब निषेधार्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा. एफआरपी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चात राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, बबन चव्हाण, नामदेव देवकते, दत्तू टिपे, गणेश माडजे, नवनाथ शिंदे, शंकर जगताप, विश्वनाथ कोळी, महादेव पाटील, लक्ष्मण मोरे, शत्रुघ्न कांबळे, गोपाळ भोजने, सुग्रीव सगर, लक्ष्मण चामे, राजेंद्र कासले, धर्मराज पाटील, सुरेश चामे, बी.आर. गारकर, शंकर जगताप आदींचा समावेश होता.
शेतकरी संघटनेचा अर्धनग्न मोर्चा
By admin | Updated: January 14, 2015 00:57 IST