औरंगाबाद : कॅन्सरचे निदान झाल्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना कुटुंबीय, मित्र परिवार, डॉक्टर्स व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची साथ मोलाची ठरली, अशी भावना कर्करोगमुक्त झालेल्या महिलेने व्यक्त केली.
दरवर्षी जून महिना हा कॅन्सरवर मात केलेल्यांचा (कॅन्सर सर्व्हायवर) महिना म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने २६ जून रोजी वुमेन्स डॉक्टर्स विंग आयएमए औरंगाबादतर्फे आयोजित ‘कर्करोगमुक्त आम्ही’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अरुणा कराड, डॉ. अनघा वरूडकर यांनी कर्करोगाबद्दल माहिती देत कर्करोगमुक्त महिलांना बोलते केले. डॉ. वरुडकर यांनी कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे सांगितले. डॉ. कराड यांनी कर्करोगाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. शिल्पा आसेगावकर यांनी केले, तर डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी आभार मानले. आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर व सचिव डॉ. यशवंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.