वाढवणा (बु.) : जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध होऊन जलकुंभात पुरवठा केला जातो; पण त्या जलकुंभाजवळ कधीच कोणताच कर्मचारी हजर नसतो. त्यामुळे हजारो रुपये खर्चून शुद्ध केलेले हजारो लिटर पाणी चक्क नालीला वाहून जात आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथे शासनाने ५ कोटी रुपये खर्च करून गावाला टँकरमुक्त केले. मात्र, ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे सदरील योजना मोडकळीस आलेली आहे. वाढवणा बु. येथे सदरील योजना कार्यान्वित करताना त्या ठेकेदाराने त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये दोन नवीन जलकुंभाची नोंद असतानासुद्धा एकच जलकुंभ उभारले आणि दुसरे जलकुंभ उभारण्याऐवजी २० वर्षांपूर्वी माजी सरपंच गणपतराव जाधव यांच्या कारकीर्दीत उभारलेल्या जलकुंभालाच नवीन रंगरंगोटी करून तीच चालू केली. ते जलकुंभ वाढवण्याच्या पश्चिम बाजूस २ कि.मी. अंतरावर असून वाढवणा ते वाढवणा पाटी या रस्त्यालगत आहे. या जलकुंभाचे पाणी पश्चिम बाजूस असलेल्या जिजामाता नगर, शिवनगर, साईबाबा मंदिर परिसर, प्रा.आ. केंद्रातील परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा केला जातो. या जलकुंभाला पाणीपुरवठा करताना केंद्रावरील कर्मचारी जलकुंभावरील कर्मचार्यास फोन करून पाणीपुरवठा करतो. जलकुंभ भरल्यानंतर येथील कर्मचार्याने शुद्धीकरण केंद्रावरील कर्मचार्यास फोन केल्यानंतर तो पुरवठा बंद होतो. पण या जलकुंभावर कर्मचारीच उपलब्ध नसल्यामुळे हजारो लिटर्स पाणी चक्क नालीला धो धो वाहते. या रस्त्यावरून एखाद्या सुजाण ग्रामस्थाने जर जलशुद्धीकरण केंद्रावर फोन केला, तरच पाणी बंद होते. अन्यथा तसेच वाया जाते. या पाण्यावर दररोज हजारो रुपये खर्च होते आणि हे शुद्ध पाणी वाया जाणे म्हणजे ग्रामपंचायत कारभाराचा कळसच आहे. याविषयी सरपंच माधव कांबळे यांनी सांगितले की, आजपर्यंत आम्हाला हा प्रकारच माहिती नव्हता. पण यापुढे काळजी घेतली जाईल आणि तशा सूचना सुद्धा त्यांनी सर्व कर्मचार्यांना दिल्या आहेत.(वार्ताहर)
वाढवणा फिल्टरचे पाणी नाल्यात !
By admin | Updated: May 25, 2014 01:11 IST