परंडा : तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामावरील मजुरांची संख्या काही केल्या वाढताना दिसत नाही. आजमितीस ५७ हजार मजुरांची नोंदणी असली तरी कामावर मात्र अवघे पावणेदोन हजार मजूर असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यामध्ये बांधकाम विभागाच्या माध्यमातून १३ कामे सुरु आहेत. तर स्थानिकस्तर विभागाकडून ३३ कामे हाती घेण्यात आली. सीना-कोळेगाव विभागाकडून १६ कामे सुरु आहेत. जि.प. बांधकामच्या भूम उपविभागाकडून ३४ कामे, उपसा सिंचन उपविभागाचे एक, लघु पाटबंधारे विभागाची दोन, तर कुंडलिका प्रकल्पाची ५ कामे सुरु आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर १३२ विहिरींची कामे करण्यात येत आहेत. ८० पैकी सिमेंट नाला बांधाची ८ कामे सुरु आहेत. तसेच ७२ रस्त्याचीही कामे करण्यात येत आहेत. कामांची संख्या बऱ्यापैकी दिसत असली तरी सदरील कामावर कार्यरत असलेल्या मजुरांची संख्या मात्र अत्यल्प आहे. आज घडीला १ हजार ८४२ मजूर उपरोक्त कामावर कार्यरत आहेत.(वार्ताहर) य्ाापूर्वी मजुरांना १६८ रुपये इतकी मजुरी दिली जात होती. शासनाने १ एप्रिल पासून मजुरीमध्ये यामध्ये १३ रुपयांची वाढ करुन ती १८१ रुपये एवढी केली आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. शेतीसह अन्य कामांमध्ये महिला मजुरांना २०० ते ३०० तर पुरुषांना ३०० ते ४०० रुपये एवढी हजेरी मिळत आहे. त्यामुळे रोहयोवरील मजूरीतही त्या प्रमाणात वाढ करण्याची गरज होती अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार सर्वसामान्य मजुरांची थट्टा करणारा असल्याचे आवारपिंपरी येथील मजूर नारायण नरुटे, पांडूरंग डाकवाले यांनी सांगितले. तर रस्त्याच्या कामाव्यतिरिक्त मातीनाला बांधाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी खंडेश्वरवाडी येथील मजूर बाबासाहेब दुरंगे यांनी केली.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात कामे मंजूर करण्यात आली आहेत. ज्या मजुरांना कामाची गरज आहे. त्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच काम उपलब्ध करुन दिले जात आहे. तसेच मजुरीही १६८ रुपयावरुन १८१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मजुरांची संख्या वाढेल, असे तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी सांगितले.
नोंदणी अर्धालाख; कामावर अवघे पावणेदोन हजार मजूर !
By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST