उस्मानाबाद : थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहकांच्या घरातील कुलर, पंखे बंद आहेत. वीजवापर कमी झाल्याने वीजबिलेही कमी येतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु, नोव्हेंबर महिन्याची बिले हातात पडताच महावितरणने ऐन दिवाळीत ग्राहकांना दणका दिल्याचे दिसून आले. अनेकांना मागील महिन्याच्या तुलनेत तब्बल दुप्पट बिले अदा करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याबाबतची कसलीही पूर्वसूचना दिलेली नसल्याने ग्राहकांतून महावितरणच्या गोंधळी कारभाराबाबत कमालीचा असंतोष व्यक्त होत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे वीजेचा वापरही बऱ्यापैकी कमी झाला आहे. असे असताना वीजबिलेही कमी येणे अपेक्षित आहे. परंतु, नोव्हेंबर महिन्यात हाती पडत असलेल्या बिलांवरील रक्कमा ग्राहकांचे डोळे पांढरे करणाऱ्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जून २०१५ मध्ये वीजेचे दर निश्चित केले आहेत. परंतु, हे वाढीव दर नोव्हेंबर महिन्यात येत असलेल्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मागील फरकाची रक्कमही याच बिलात समाविष्ठ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठीच्या निव्वळ बिलामध्येही मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळते. बीपीएल कुटुंबांना पूर्वी ०.७४ पैसे प्रति युनिट या प्रमाणे दर आकारला जात होता. नवीन दरानुसार ०.८७ रूपये आकारण्यात येत आहेत. पूर्वी ज्या ग्राहकांचा वीजवापर १०० युनिट होत असे. त्यांना प्रतियुनिट ३.३६ पैसे (इतर कर वगळता) या प्रमाणे ३३६ रूपये मोजावे लागत असत. परंतु, ३७४ रूपये मोजावे लागत आहेत. ३०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांना पूर्वी ६.५० पैसे प्रतियुनिट प्रमाणे बिलाची आकारणी होत असे. तेव्हा १ हजार ९५० रूपये बिल येत असे. आता याच ग्राहकांना २ हजार १६३ रूपये म्हणजेच २१३ रूपये अतिक्त भार सोसावा लागणार आहे. यामध्ये प्रतियुनिट ०.७१ पैसे एवढी वाढ झाल्याचे दिसून येते. पाचशे युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांना ७ रूपये ९२ पैसे या दराने वीजबिल आकारले जात होते. तेव्हा संबंधित ग्राहकास ३ हजार २५० रूपये मोजावे लागत होते. आता ९ रूपये ९५ पैसे प्रतियुनिट या प्रमणे ४ हजार ७५० म्हणजेच १ हजार ५०० रूपये इतका जास्तीचा भार सोसावा लागत आहे. हेच चित्र १ हजारापेक्षा जास्त वीजवापर असणाऱ्या ग्राहकांच्या बाबततीत पहावयास मिळते. या ग्राहकांना पूर्वी प्रतियुनिट ९.५० पैसे मोजावे लगत होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. १२.५० पैसे आकारले जात आहेत. म्हणजेच ज्या ग्राहकांना ८ जार ७८० रूपये बिल येत असे. त्यांना आता ११ हजार ३१० रूपये म्हणजेच २ हजार ५३० रूपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. हे कमी म्हणून की काय, जूनपासून ते आजतागायत वाढीव बिलाच्या फरकाची रक्कमही नोव्हेंबर महिन्यात येत असलेल्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव वीजबिलाचे सदरील आकडे ग्राहकांना धक्का देत आहेत. (प्रतिनिधी) महावितरणने वितरीत केलेली अधिक रकमेची बिले ग्राहकांच्या हातावर पडल्यानंतर अनेकांनी विज कंपनीचे कार्यालय गाठले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली. काहींनी दुपारच्या सुमारास अधिक्षक अभियंता रोहितराज पापडकर यांचे कार्यालय गाठले असता. नेहमीप्रमाणे ते तेथे उपस्थित नव्हते. दरम्यान, याबाबत भ्रमणध्वनीवरुन त्यांच्याशी संपर्क साधला असता, नुकत्याच दिलेल्या वीज बिलात वाढ झाल्याचे मलाही समजले आहे. मात्र नेमका काय प्रकार आहे, याची मला कल्पना नाही. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या अकाऊंट विभागाशी चर्चा करा असे त्यांनी सांगितले. प्रति युनिट किती दर वाढले?, दुप्पटीने बिले का आली? कोणत्या दराने बिले आकारली जातात? याची इत्यंभूत माहिती अधिक्षक अभियंत्यासह कोणाकडेही नसल्याने एक अधिकारी दुसऱ्याकडे बोट करीत असल्याने ग्राहकांच्या संभ्रमात आणखीणच भर पडली.
वीज ग्राहकांच्या खिशावर डल्ला!
By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST