बाळासाहेब जाधव, लातूरस्थानिक पातळीवरील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१० गावांत प्रभाग निहाय कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे़ या आरक्षणासंदर्भात हरकत दावे दाखल करण्यासाठीचा कालावधी ५ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आल्याने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे़ २०११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामध्ये ५० टक्के सहभाग महिला उमेदवारांना देण्यात येणार आहे़ स्थानिक स्तरावर मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आजही विशेष महत्त्व आहे़ २०१५ मध्ये ४१० गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहेत़ यामध्ये लातूर तालुक्यातील ६४ गावे, रेणापूर-२९, औसा-४५, निलंगा-४८, उदगीर-६१, अहमदपूर-४९, चाकूर-२४, देवणी-३५, शिरुर अनंतपाळ-२७, जळकोट-२८ असा एकूण ४१० ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे़ या आरक्षणाबाबत दावे हरकती दाखल करण्याचा कालावधी २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ठेवण्यात आला आहे़ याबाबत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले हे ९ फेब्रुवारीपर्यंत या हरकती बाबत निर्णय देणार आहेत़ १३ फेब्रुवारी रोजी (अ) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे़ आणि या यादीनुसारच ग्रामविकास विभागाला या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे़ ४लातूर जिल्ह्यातील ७८८ ग्रामपंचायती आहेत़ त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०१५ मध्ये ४१० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत़ दुसऱ्या टप्प्यात २०१६ मध्ये १०, तिसऱ्या टप्प्यात २०१७ मध्ये ३५५, चौथ्या टप्प्यात २०१८ मध्ये १० तर पाचव्या टप्प्यात २०१९ साली ३ अशा एकूण ७८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत़ ५ वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे़ प्रभाग आरक्षणाची सोडत सुरू असून यावर दावा, हरकती मागविण्याचे काम सुरू आहे़ ३१ जानेवारीपर्यंत ३ गावच्या हरकती आल्या आहेत़ ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत़ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत ३३ टक्के महिलांना संधी देण्याचे नियोजन करण्यात आले होते़ यामध्ये निवडणूक विभागाने बदल करुन ग्रामस्तरावरही महिला उमेदवारांना ५० टक्के संधी देण्यात येणार आहे़ त्यामुळे अनेक गावांमधे महिला बहूल ग्रामपंचायती होणार असल्याचे मत सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांनी व्यक्त केले़ लातूर तालुक्यातील काडगाव मधून कृष्णनगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली असून, या ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे़ लातूर जिल्ह्यातील ४१० गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले़ निवडणुकीच्या चर्चेला उधान आले आहे़ निवडणूक प्रक्रियेमध्ये गतवर्षीच्या प्रमाणापेक्षा कमालीचे बदल करण्यात आले असून, ग्रामपंचायतीचे निकाल लांबणीवर पडण्याऐवजी मतदानादिवशीच लागणार आहेत़ त्यामुळे निवडणूक निकाल प्रक्रियेवरील वाढता खर्च टाळला जाणार आहे़ प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत झाल्यामुळे आता गावातील चित्र स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आतापासूनच कामाला लागले आहे़ सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यावर पुन्हा गावांगावांमध्ये निवडणुकीची रंगत वाढणार आहे़ शिवाय, पहिल्यांदाच मतदानाची वेळ पूर्ण झाल्यावर गावातच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांना उत्सुकता लागली आहे़
मतदानादिवशीच गावात लागणार निकाल
By admin | Updated: February 1, 2015 00:50 IST