अंबाजोगाई : एक मुलगा आजाराने तर दुसऱ्याने नापिक जमिनीमुळे व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य आल्याने आत्महत्या केली. कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच जीवनयात्रा संपविल्याने चौदा जणांचे कुटुंब उघडयावर आले. अंथरूणावर खिळलेल्या ऐंशी वर्षीय वृद्ध पित्यासमोर कुटुंब चालविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशा भीषण स्थितीत सामना करायचा तरी कसा? ही मोठी समस्या बर्दापूर येथील सूर्यवंशी कुटुंबासमोर उभी राहिली आहे. तालुक्यातील बर्दापूर येथील ज्ञानेश्वर मोहनराव सूर्यवंशी (वय - ३८) या शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याने शेतातील विद्युत तारेला हातात घेऊन आत्महत्या केली. बर्दापूर येथील मोहनराव सूर्यवंशी (वय - ८०) हे वृद्धापकाळाने व हत्तीपायाच्या आजाराने त्रस्त असल्याने अंथरूणावर खिळून आहेत. त्यांना दोन मुले होती. दोन वर्षांपूर्वी एका मुलाचे आजाराने निधन झाले. तर दुसरा ज्ञानेश्वर याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मोहनराव यांच्या मालकीची १६ एकर शेतजमीन आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने उत्पादन घटले. तसेच गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीमुळेही मोठे संकट समोर आले. गारपिटीचा सामना करतांना अत्यल्प पावसाने पिके गेली. उत्पादन घटले. शेतात लावलेल्या ऊसालाही पाणी द्यायचे तर विहिरीनेही तळ गाठला. अशा भीषण स्थितीत कुटुंब कसे चालवावे, असा मोठा पेच ज्ञानेश्वर यांच्यासमोर उभा राहिला. ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबात आई-वडील, मोठी भावजय तिची मुले, स्वत:च्या पाच मुली व एक मुलगा असा चौदा जणांचा परिवार आहे.त्यात वडीलांच्या आजारामुळे मोठा खर्च होऊ लागला. आर्थिक स्थिती खालावली व खर्च वाढू लागला. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे आकडेही फुगू लागले. अशा भीषण स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? हा मोठा प्रश्न ज्ञानेश्वर यास भेडसावू लागला. या स्थितीतून नैराश्य आल्याने २८ नोव्हेंबर रोजी तो शेतात गेला. शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेले केबल हातात धरून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. दोन्ही मुलांच्या निधनाचे दु:ख अंथरूणावर खिळलेल्या मोहनराव यांच्यासमोर उभे राहिले. हा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आता कोण चालविणार? हा प्रश्न वृद्धापकाळातही त्यांना भेडसावू लागला आहे. दोन दिवस सहानुभुती दर्शविली जाते. पुन्हा काय? अंथरूणावर खिळलेल्या स्थितीत कुटुंब चालविण्याचे मोठे आवाहन त्यांच्यासमोर उभे आहे. सव्वा लाखांची मदतआ. धनंजय मुंडे यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पाच मुलींच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपये या प्रमाणे सव्वा लाख रुपयांची मदत त्यांनी शिक्षणासाठी मुलींना केली आहे. जोडवाडी येथील गोविंद प्रल्हाद इंगळे (वय - ३८) या शेतकऱ्याने धसवाडी शिवारातील शेतातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. मुलीचे जमलेले लग्न कसे करायचे? याच्या धास्तीने २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता शेतातच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. मात्र, ही मदत देतांना त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना कागदपत्रांची पुर्तता करतांना नाकीनऊ येतात. ४कृषि अधिकारी, महसूल, पोलिस ठाणे, रुग्णालय यांचे अहवाल एकत्रित करून ते सादर करायचे. मग तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविला जातो.४ पाठविलेल्या प्रस्तावाचीही शहानिशा करण्याची लालफितीची यंत्रणा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नैराश्य आणते. परिणामी शासकीय मदत विंवचनाच ठरते, असे सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजय बुरांडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले़
आत्महत्येमुळे १४ जणांचे कुटुंब उघडयावर
By admin | Updated: December 11, 2014 00:44 IST