औरंगाबाद : शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. कधी संततधार तर कधी मुसळधार स्वरूपात दिवसभर पाऊस बरसत राहिला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरातील सखल भागातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले होते. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.शहरात मागील दोन दिवस सायंकाळच्या वेळी रिमझिम पाऊस झाला. सोमवारी रात्रीही पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारी सकाळी काही वेळासाठी हा पाऊस उघडला. परंतु सकाळी १० वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दिवसभर हा पाऊस सुरूच होता. संततधार स्वरूपात बरसणाऱ्या पावसाचा जोर अधूनमधून वाढत होता. दुपारी आणि सायंकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. १३ वी योजना जयभवानीनगरमधील जागृती हनुमान मंदिराजवळील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. जयभवानीनगरातील शिवाजी चौकातील तापडिया अपार्टमेंटच्या तळघरातही दुपारी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे सातारा परिसरातही हाहाकार उडाला. येथील रेणुका माता मंदिराजवळील विद्यानगरातही असंख्य घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. याचप्रमाणे न्यू भाग्योदयनगर, छत्रपतीनगर, अलोकनगर आदी भागात पावसामुळे दैना उडाली. बन्सीलालनगरातील तंदूर हॉटेलजवळील एका दुकानात पाणी शिरले. हडकोतही अनेक भागांना पावसाचा फटका सोसावा लागला. जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आले होते. रेल्वेस्टेशन, जटवाडा रोड, हरिओमनगर, सातारा परिसर, देवळाई, जयभवानीनगर, बन्सीलालनगर, उत्तमनगर, बालाजीनगर, संजयनगर, कैलासनगर, त्रिमूर्ती चौक, मुकुंदवाडी भागातील संतोषी माता कॉलनी आदी ठिकाणी पाणी साचले होते. या भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरम्यान या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती. बहुतेक लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्यामुळे बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातून परतणारी मुले, त्यांना आणण्यासाठी गेलेले पालक तसेच इतर कामांच्या ठिकाणी परतणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. औरंगाबाद : मागील दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू असून, मंगळवारी शहरातील अनेक सखल भागात अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले. अग्निशमन दलाकडे दिवसभरात ३७ पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पाणी काढण्याच्या तक्रारींमुळे अग्निशमन दलाची बरीच दमछाक होत होती.पावसाळ्यात पाणी साचून राहू नये, पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा यासाठी मनपाने कोणतीच तयारी केली नव्हती. जिथे लहान-मोठे नाले आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील नाल्यांची अवस्था दिवसेंदिवस नालीसारखी होत आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी सुरूच होता. दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. अवघ्या दीड ते दोन तासांत शहरातील अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. जयभवानीनगर परिसरातील तापडिया अपार्टमेंट येथे अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. त्याचप्रमाणे बन्सीलालनगर भागातील दुकानांमध्येही चांगलेच पाणी शिरले होते. सिडकोतील तेराव्या योजनेत जागृत हनुमान मंदिराजवळील काही घरांमध्ये पाणी साचले होते. बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर परिसर, विद्यानगर येथेही अनेक घरांमध्ये पाणी शिरले.नियंत्रण कक्षात तक्रार नाहीपावसाळा सुरू होताच महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केले. या कक्षात तीन शिफ्टमध्ये वेगवेगळे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून नियंत्रण कक्षात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. मनपाने नियंत्रण कक्षासंबधी नागरिकांमध्ये अधिक जनजागृतीच केलेली नाही. या कक्षात लवकरच एक टोल फ्री क्रमांकही बसविण्यात येणार आहे. औषधी भवनची तक्रार नाहीदरवर्षी शहरात थोडासाही पाऊस झाल्यास गोमटेश मार्केट परिसरातील औषधी भवनच्या नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. यंदा मनपाने नाल्यातून पाणी कसे वाहून जाईल या दृष्टीने बरेच प्रयत्न केले. मंगळवारी नागरिकांनी मनपाकडे कोणतीही तक्रार केली नाही.
धुवाधार पावसाने शहरवासीयांची दैना
By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST