औरंगाबाद : दोन दिवसांत मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे रबीची पेरणी वाढणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नियोजन सुरू आहे. पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत तीन जिल्ह्यांत रोजगार, चारा आणि पाणीपुरवठ्याचे आव्हान मात्र कायम आहे. मराठवाड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी काही जिल्ह्यांत २० तासांपेक्षा अधिक वेळ दमदार वृष्टी झाली. या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या वर नेली असून, ती ५१.१२ टक्के इतकी झाली आहे. रबी हंगामालाही हा पाऊस पूरक ठरला आहे. ही परिस्थिती विशेषकरून हिंगोली, परभणी, जालना अािण औरंगाबाद जिल्ह्यांत आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर नव्हता. बीड जिल्ह्यांतही रिमझिम पाऊसच झाला. यासंदर्भात महसूल यंत्रणेकडून आढावा घेतला जात आहे. मराठवाड्यात यंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे पिके हातची गेली. तरीही हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत बऱ्यापैकी परिस्थिती होती. लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या सहा जिल्ह्यांतील पीक आणि पाण्याची परिस्थिती चांगली नव्हती. विशेषकरून बीड आणि लातूर जिल्ह्यांत परिस्थिती बिकट होती. दोन दिवसांच्या पावसामुळे औरंगाबाद, जालना आणि नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुसह्य झाला आहे. लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळानंतर उद्भवणार आहे. विभागीय आयुक्तालयातर्फे दोन दिवसांत झालेल्या पावसानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांवरील संकट कायम आहे. काही प्रमाणात रबीला हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र, परिस्थिती सुसह्य झाली, असे म्हणता येईल. प्रशासन कामाला लागले खरीप वाया गेल्याने यावेळी बीड जिल्ह्यात रबीची पेरणी ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक होईल. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.शेतमजुरांसाठी नरेगाचे काम देण्याचे नियोजन केले आहे. सध्या जलयुक्त शिवाराची जी कामे झाली आहेत त्यामुळे पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे असे ‘लोकमत’ला बोलताना बीड चे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
धुवांधार पावसामुळे दुष्काळ संपला असे म्हणता येणार नाही
By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST