ही चिमणी पाखरं. आप्तस्वकियापासून दूर राहणारी. ती एकमेकांना ‘ताई, माझ्यासोबतच राहणा’ अशी साद घालत होती. परिस्थितीने शहाणपण शिकलेली बहीण म्हणाली ‘स्वत:ची काळजी घे, सरांना त्रास देऊ नकोस’ हे वाक्य ऐकूण तेथील अधिष्ठाता, शिक्षक, अन्य कर्मचाऱ्यांचाही हुंदका दाटला. आईवडिलांचे छत्र हरपलेल्या भाऊ-बहिणींची राखीपौर्णिमेच्या दिवशी प्रशासनाने भेट घडवून आणली, याचा आनंद निरीक्षणगृहातील सर्वांना झाला होता. अनाथ झाल्याने सांभाळणारे कोणी नाही म्हणून त्या मुलांना निरीक्षण गृहात तर मुलींना विद्यादीप मुलींचे बालगृहात ठेवण्यात आले आहे. त्या भाऊ-बहिणींपैकी कोणी तीन तर कोणी मागील पाच वर्षांपासून ऐकामेकांना भेटले नाही. आपली बहीण कोणत्या बालगृहात आहे हे सुद्धा त्या भावांना माहिती नव्हते.
बाल निरीक्षणगृहातील विजय विघ्ने यांनी त्या मुलांची मनातील चलबिचल ओळखली व त्यांच्या बहिणींचा शोध घेणे सुरू केले. त्यातील पाच मुलांच्या सात बहिणी विद्यादीप बालगृहात असल्याचे त्यांना कळले. विद्यादीपमधील अलका साळुंके यांनी त्या बहिणींना मुलांच्या निरीक्षणगृहात पाठविले व ताटातूट झालेले भाऊ-बहिण राखीपौर्णिमेला भेटले.
लग्न झालेल्या एका बहिणीने बालगृहातील अधीक्षकांच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंग करून आपल्या भावाशी संवाद साधून मन मोकळे केले.
-----------------------------------------