उस्मानाबाद : औरंगाबादहून लातूरपर्यंत फैलाव झालेला ‘स्वाईन फ्ल्यू’ आजाराने जिल्ह्यात पाय पसरू नये, यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय सज्ज झाले आहे़ जिल्हा रूग्णालयात संशयीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे़ तसेच तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ जिल्हा रूग्णालयात आजवर संशयीत रूग्ण आढळला नसल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले़महाराष्ट्रात चालू वर्षाच्या प्रारंभीच स्वाईन फ्ल्यूचे संशयीत रूग्ण आढळल्याने दहशत पसरली होती़ त्यानंतर औरंगाबाद व लातूर येथेही संशयीत रूग्ण आढळून आले आहेत़ त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने स्वाईन फ्ल्यूला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत़ जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूबाबत प्रशिक्षण घेतलेले तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही कर्मचारी कार्यरत करण्यात आले आहेत़ जिल्हा रूग्णालयाकडे ५००० मास्क, स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी लागणाऱ्या ६५०० गोळ्यांचा साठा आहे़ तसेच ऐनवेळी लागणारे चार व्हेंटीलेटरही आहेत़ दैनंदिन कामकाजावेळी एखादा संशयीत रूग्ण आढळून आला तर त्याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ शिवाय रूग्ण आढळून आलेच तर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूबाबत दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना तीन-चार दिवसांपेक्षा अधिक सर्दी-खोकला असेल तर तपासणी करून घेणे आवश्यक आहे़स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या संशयित रूग्णांची जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यात येत आहे़ एखादा संशयीत रूग्ण आढळला तर त्याला देण्यासाठी लागणाऱ्या ‘टॅमीफ्ल्यू’ या ६५०० गोळ्या जिल्हा रूग्णालयाकडे उपलब्ध आहेत़ स्वतंत्र वार्डाची उभारणी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
‘स्वाईन फ्ल्यू’बाबत जिल्हा रूग्णालय ‘अलर्ट’
By admin | Updated: February 1, 2015 00:57 IST