जालना : जिल्ह्यात पंचायत समिती पातळीवर अनेक गावांमधील टँकरचे प्रस्ताव रखडल्याच्या मुद्यावरून मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची गोंधळ घातला. प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करून या सदस्यांनी सभात्याग केला. दुपारी २.३० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सभापती वर्षा देशमुख, शीतल गव्हाड, रुख्मीणी राठोड, बप्पासाहेब गोल्डे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ग्रामीण भागात वीज बील थकबाकीमुळे शेतकर्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याबद्दल अनिरुद्ध खोतकर, सतीश टोपे यांनी नाराजी व्यक्त करून महावितरणच्या अधिकार्यांनी कठोर भूमिका न घेता शेतकर्यांना बील भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या मुद्यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. काही गावांतील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे सतीश टोपे यांनी सांगितले. ज्या गावात टंचाई आहे, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसील कार्यालयात पडून आहेत. काही ठिकाणी तर ग्रामसेवकांनी प्रस्तावच तयार केलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप टोपे यांनी केला. वाकुळणीकर यांनीही बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांचे प्रश्न मांडले. त्यावर काही गटविकास अधिकार्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. पदाधिकारी व प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करून विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांसह सभा सुरू होती. खोतकर, संभाजी उबाळे, रामेश्वर सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. सुरुवातीला जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबद्दल व दानवेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सदस्य भगवानसिंग तोडावत यांच्या वतीने सभागृहात पेढे वाटप करण्यात आले. अंबड तालुका टंचाई निवारणाची बैठक पालकमंत्री राजेश टोपे यांनी स्वतंत्र घेतली. तर त्यानंतर आ. संतोष सांबरे यांनीही बैठक घेतली. मात्र दोन्ही बैठकांपैकी कोणत्या बैठकीतील सूचना टंचाई निवारण आराखड्यात घ्यायच्या, अशा संभ्रमात प्रशासन होते, अशी माहिती सेनेचे अनिरुद्ध खोतकर यांनी सभागृहात दिली. त्यामुळेच अंबडच्या गटविकास अधिकार्यांना सभागृहात उत्तरे देताना अडचण झाली, अशी पुष्टीही खोतकर यांनी जोडली. ... तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार जिल्हा परिषद प्रशासनाने आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आजपर्यंत कधीच गांभीर्याने कार्यवाही केलेली नाही. सातत्याने विविध प्रश्न मांडले. काही घोटाळेही उघड केले, मात्र प्रशासनाकडून कार्यवाहीसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने हीच भूमिका कायम ठेवल्यास पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रशासनातील अधिकार्यांची तक्रार करू, असा इशारा जि.प.तील राकाँचे गटनेते सतीश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी काँग्रेसचे राजेश राठोड, एल.के. दळवी, राकाँचे अॅड. संजय काळबांडे, आशा आकात, पं.स. सभापती अनिता पैठणे आदींची उपस्थिती होती.
पाणीटंचाईवरून विरोधकांचा सभात्याग
By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST