लातूर : प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातून सामाजिक प्रश्नांची उकल झाली असल्याची भावना चित्रपट अभिनेत्याबरोबरच प्रेक्षकांनी बुधवारी येथील दयानंद सभागृहात व्यक्त केली.‘लोकमत सखी मंच व युवा नेक्स्ट’ सदस्यांसाठी बुधवारी ‘इश्क वाला लव्ह’ फिल्म प्रमोशन अॅक्टिव्हिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपट अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री सुलग्ना पानीगृही, गीतकार मंगेश बोरगावकर, संगीतकार विश्वजीत जोशी यांच्यासह द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, मनोजा एजन्सीचे प्रवीण ब्रिजवासी यांची उपस्थिती होती. यावेळी अभिनेते अदिनाथ कोठारे म्हणाले, ‘इश्क वाला लव्ह’ हा विषय जिव्हाळ्याचा आणि महाविद्यालयीन तरुणांच्या आणि इतरांच्याही जिव्हाळ्याचा बनला आहे. या चित्रपटातून तरुण पिढीसमोर प्रेम, मनोरंजन याची माहिती मिळतेच. त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशन याच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशन हेच महत्वाचे आहे का? हा प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजात विविध प्रश्न आहेत़ त्यामध्ये विवाह आणि लिव्ह इन रिलेशन या बाबीकडे आकर्षित होणारी तरुणाई आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. यामुळे तरुणाईची होणारी घुसमट आदी बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पुढे कोठारे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा केवळ मनोरंजनावरच भर देण्यात येत आहे. परंतु, मनोरंजना बरोबरच सामाजिक समस्या मांडून वास्तव चित्र समाजासमोर मांडणेही आवश्यक आहे. या चित्रपटातून हाच प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.सूत्रसंचालन प्राग़णेश बेळंबे यांनी केले़ या कार्यक्रमाचे प्रायोजक द्वारकादास शामकुमार, मनोजा एजन्सी, राजभोग आटा हे होते़ तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथेही या चित्रपट प्रमोशनसाठी कार्यक्रम घेण्यात आला़ या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा़ सुधीर आनवले यांनी केले़ (प्रतिनिधी)यावेळी गायक मंगेश बोरगावकर यांनी चित्रपटातील गीत सादर करताच सखी मंचच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला़ अभिनेता अदिनाथ कोठारी व अभिनेत्री सुलग्ना पानीगृही यांनी गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. यावेळी चित्रपटातील काही क्षणचित्रेही दाखवण्यात आली.शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अभिनेते अदिनाथ कोठारे यांनी महाविद्यालय तरुणांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास महाविद्यालयीन तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. तितक्याच तन्मयतेने कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पानीगृही यांनी माहिती देऊन युवकांच्या समस्यांचे निरसन केले. यावेळी जल्लोषच साजरा होत असल्याचे पहावयास मिळाले.
मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांची उकल
By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST