औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीत विकेंद्रीकरणाचे वारे वाहू लागले आहे. कामात गतिमानता आणण्यासाठी लवकरच राज्यात औरंगाबादसह चार ठिकाणी प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ही कार्यालये १५ आॅगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.महावितरण कंपनीचा संपूर्ण कारभार मुंबईतील मुख्यालयातून चालतो. जिल्हास्तरावर कंपनीची मंडळ, परिमंडळ कार्यालये आहेत. तरीही सर्व अधिकार मुख्यालयाकडेच केंद्रित झालेले आहेत. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवावे लागतात. परिणामी मुंबईतील कार्यालयातून गतिमान पद्धतीने कामकाज करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकेंद्रीकरणाचा प्रयत्न चालविला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील वीज कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात त्यांनी स्वत:च तशी माहितीही दिली होती.मात्र, आता या हालचालींना वेग आला असल्याची माहिती आहे. महावितरण कंपनीत व्यवस्थापकीय संचालक हे प्रमुख पद आहे. या पदावरील वरिष्ठ दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांकडून महावितरणचा कारभार हाकला जातो. परंतु आता औरंगाबादसह, नागपूर, पुणे आणि मुंबई अशा चार ठिकाणी प्रादेशिक कार्यालये उघडण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक हे प्रमुख पद असणार आहे. या पदावर ज्युनिअर आयएएस अधिकारी किंवा सीएची नियुक्ती केली जाणार आहे. या विकेंद्रीकरणानंतर बदल्यांसह सर्व प्रकारचे अधिकार प्रादेशिक कार्यालयाकडे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे कामात गतिमानता येईल तसेच वसुली, वीज गळती यासारख्या विषयांवर अधिक बारकाईने लक्ष दिले जाऊ शकेल. सध्या विकेंद्रीकरणाच्या हालचालींना गती आली असून, येत्या १५ आॅगस्टपर्यंतच हे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
महावितरणमध्ये विकेंद्रीकरणाचे वारे
By admin | Updated: June 20, 2016 00:58 IST