माजलगाव : गोठ्याला लागलेल्या आगीत अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा जळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील लोणगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली. या बालकाची दोन भावंडे बालंबाल बचावली.हर्षवर्धन बापूराव कोळसे असे त्या मयत बालकाचे नाव आहे. लोणगाव येथील बापूराव कोळसे यांना गावालगत दीड एकर शेती आहे. बापूराव हे ऊसतोडणीचे काम करतात. ते एकटेच ऊसतोडीसाठी कोल्हापूरला गेलेले आहेत. रविवारी गोठ्यालगतच त्यांची पत्नी गीता कापूस वेचणी करीत होती तर त्यांची तीन मुले गोठ्यात खेळत होती. गोठ्याच्या छतावरून गेलेल्या तारांमध्ये घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या गोठ्यावर पडल्याने आग लागली. गोठ्याच्या छतावर ऊसाचे पाचरट असल्याने अवघ्या काही क्षणात आगीने संपूर्ण गोठ्याला कवेत घेतले. धुराचे लोळ पाहून कोळसे यांच्या पत्नीने आरडाओरड केली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत हर्षवर्धन हा जळून जागीच मृत्यूमुखी पडला. शेजारील अशोक कोळसे यांनी जीव धोक्यात घालून पेटत्या गोठ्यात उडी घेत भुजंग (वय ६) व सहा महिन्याच्या मुलीस बाहेर काढले. दिंद्रुड ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा केला. (वार्ताहर)आग लागल्यानंतर मोठा मुलगा भुजंग आई-आई असे ओरडला. त्यानंतर गीता कोळसे यांनी गोठ्याकडे धाव घेतली.४आग मोठी असल्यामुळे तिला काहीच करता आले नाही. हर्षवर्धन डोळ्यादेखत जळत होता. मातेने टाहो फोडल्याने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले.४वाचलेली इतर दोन चिमुकले प्रचंड भयभीत अवस्थेत आहेत.बापूराव कोळसे यांनी ऊसतोडीला जाताना तिन्ही मुले लहान असल्यामुळे पत्नी व मुलांना गावीच ठेवले होते.४आगीत त्यांचा मुलगा हर्षवर्धन तर वाचला नाहीच परंतु गोठा खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आला. खबर मिळताच ते लोणगावकडे रवाना झाले होते.
चिमुकल्याचा मृत्यू
By admin | Updated: February 8, 2016 00:24 IST