लातूर : लातूर तालुक्यातील साई नदीपात्रात वाळू उपसा करताना ढिगारा ढासळल्याने एका मजुराचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली असून, या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तिघा मजुरांना वाचविण्यात नागरिकांना यश आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर तालुक्यातील साई येथील नदीपात्रात दुपारी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळू उपसा रविवारी सुरु होता. या ट्रॅक्टरवर आरजखेडा येथील चार मजूर काम करत होते. नदीपात्रातील वाळू उपसा करत असताना, ढिगाऱ्याच्या तळाला हे मजूर वाळू उपसा करत होते. यावेळी ढिगाऱ्याच्या तळाशी वाळू उपसा होत असताना ढिगारा कमकुवत झाला. याबाबतचा या मजुरांना अंदाज आला नाही. वाळू उपसा सुरु असताना हा ढिगारा अचानक कोसळल्याने चार मजूर गाडले गेले. नदीपात्रात दुसऱ्या बाजुला वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीच्या सहायाने हा ढिगारा उपसण्याचे काम सुरु झाले. यातील तीन मजुरांना वाचविण्यात यश आले. एका मजुराचा ढिगाऱ्याखाली गुदमरल्याने मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या मजुराचे शिवाजी दगडू जोगदंड (५५, रा. आरजखेडा) असे नाव आहे. संतोष जोगदंड, महादू सूर्यवंशी याच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
वाळूच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून मजुराचा मृत्यू
By admin | Updated: January 4, 2016 00:03 IST