उस्मानाबाद : टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढू लागल्याने टँकरची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्हाभरातील सुमारे अडीचशेवर गावांना ७३ टँकर आणि साडेचारशेवर अधिग्रहणाच्या माध्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.तीन-चार वर्षापासून जिल्ह्यामध्ये सातत्याने कमी पाऊस होत आहे. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये फारशी वाढ झाली नव्हती. तसेच भू-जल पातळीही अपेक्षित प्रमाणात उंचावली नाही. त्यामुळेच यंदा ऐन हिवाळ्यामध्येच काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येवून ठेपली. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे जलस्त्रोतही झपाट्याने आटू लागले आहेत. परिणामी उपाययोजनांची संख्याही त्याच गतीने वाढू लागली आहे. अनेक गावांमध्ये अधिग्रहणासाठीही जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अशा गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या ७३ वर जावून ठेपली आहे. या माध्यमातून जवळपास ५७ गावांची तहान भागविली जात आहे. टँकर भरण्यासाठी सुमारे ६१ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, काही गावांमध्ये सार्वजनिक जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावल्याने ग्रामस्थांना टंचाईलला तोंड द्यावे लागत आहे. अशा गावांसाठी खाजगी जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास २०० गावांसाठी अधिग्रहणाचा अधार मिळाला आहे. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३८८ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. भविष्यात टंचाईचे चटके अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असल्याने प्रशासनाकडून टंचाई निवारणार्थ करावायाच्या उपाययोजना कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सध्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अडीचशे गावांना टंचाईचे चटके !
By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST