संजय कुलकर्णी , जालनासुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील जलकुंभ अत्यंत जीर्ण झाल्याने तो धोकादायक आहे. तर मुख्य जलशुद्धीकरण केंद्रातील तिन्ही जलकुंभांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे महिनोमहिने या जलकुंभांची स्वच्छताच होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शहरात नवीन भागासाठी घाणेवाडी जलाशय तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. गेल्या चार दिवसांपासून घाणेवाडी जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तेथून पाणी घेणे बंद आहे. शहरवासियांना दररोज ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र साठवण क्षमता कमी असल्याने दररोज ६ ते ७ एमएलडी एवढेच पाणी या जलकुंभांमध्ये साठवले जाते. त्यामुळे शहरात सहा-सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलशुद्धीकरण केंद्र हे निजामकालीन आहे. १९६४ मध्ये या केंद्रात साडेनऊ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. त्यानंतर १९८४ मध्ये याच क्षमतेचा तर २००३-०४ मध्ये २२ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. या तीन जलकुंभांमध्ये नवीन जालन्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची साठवण केली जाते. ५० वर्षे जुन्या झालेल्या जलकुंभाच्या पायऱ्यांभोवती नेहमी आग्यामोहोळ असते. यापूर्वी आग्यामोहळाने काही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर तर एका अभियंत्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. त्यामुळे या पायऱ्यांजवळ कोणी जात नाही. शुद्धीकरण केंद्रातील उर्वरीत दोन जलकुंभांमध्ये कर्मचाऱ्यांना आतमध्ये उतरण्यास पायऱ्याच नाहीत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण या लोखंडी पायऱ्यांना उतरती कळा आलेली असल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.या जलकुंभांमध्ये वर्षानुवर्षे स्वच्छता केली जात नाही. अग्निशामक दलाच्या पंपाद्वारे आत पाणी सोडून स्वच्छता केली जाते, असा दावा तेथील कर्मचाऱ्यांकडून केला जातो. परंतु या जलकुंभांची दुरावस्था लक्षात घेता त्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून झालेली नसावी, असे दिसून येते. जालना जिल्हा निर्मितीपूर्वीचा जलकुंभ येथे आहे. परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या जलकुंभावर जाणे म्हणजे जोखीम घेण्यासारखे आहे. नगरपालिकेने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरात धोकादायक जलकुंभ; काहींची दुरावस्था
By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST