रमेश शिंदे/ महेबूब बक्षी ल्ल औसा दिवसभर उन्हाळ्यासारखं कडक उन्हं तर रात्रभर टिपूर चांदणं़ पावसाळा मध्यावर आला तरी हे चित्र आहे़ औसा तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पावसाळा संपला तरीही कुठे पाणी नाही़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या पण तब्बल सव्वा महिना झाला पाऊस झाला नाही़ पावसाअभावी ९८ हजार हेक्टरवरील पिके मात्र अखेरच्या घटका मोजताहेत़ पिके तर वाळून जात आहेत़ पण जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे़ पिकांनी माना टाकल्या़ दावणीची जनावरे आशळभूतपणे मालकाच्या हाताकडे पाहत आहेत़ शेतकरी मात्र कोलमडून पडला आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो़ १ लाख २१ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र आहे़ यामधील १ लाख ११ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होते़ यावर्षी कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली आहे़ तालुक्यातील ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तर इतर पिकामध्ये २० हजार ७६६ हेक्टरवर तूर, ९ हजार ५२८ ज्वारी, २ हजार २६४ उडीद, २ हजार २१४ मुग, १ हजार २०४ मका, ४३२ भात, २९१ बाजरी, ५१३ भुईमूग, १४७ तीळ, २०७ कारळ व ४७८ हेक्टर क्षेत्रावर इतर पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ ९ व १० जुलैला पडलेल्या कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या़ त्यानंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडत गेल्यामुळे पीक परिस्थिती चांगली होती़ पण मागील पंधरा दिवसापासून मात्र पाऊस गायब झाल्यामुळे ९८ हजार हेक्टरवरील पिके आता शेवटच्या घटका मोजत आहेत़ पाऊस उशिरा पडल्याने पेरण्या जरी उशीरा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी व कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली़ पण पावसाअभावी आता शेतकरीच कोलमडून पडला आहे़ दिवसभर कडक उन्ह आणि रात्रभर टिपूर चांदणं़ यामुळे पीक आता अखेरच्या घटका मोजत आहेत़ सध्या तालुक्यातील २५ ते ३० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ नद्या, नाले, तलाव, विहिरी अजूनही कोरड्या आहेत़ पावसाळ्याची अडीच महिने संपले तरीही दमदार पाऊस झालेला नाही़ दुष्काळाची छाया मात्र दिवसेंदिवस गडद होत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़ औसा तालुक्यातील भादा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झाला नाही़ पेरणीपूर्वी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ त्यात ८० टक्के हे सोयाबीनचे आहे़ पेरणीनंतर एकही पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविला आहे़ भादा येथील मधुकर बनसोडे, शिवली येथील इस्माईल तांबोळी, महेबुब तांबोळी, कोरंगळा येथील बाबुराव शिखरे, भादा येथील अझरोद्दीन बक्षी, बाबुलाल होगाडे, अंदोरा येथील शन्नू पटेल, नय्युम पटेल, हारूण शेख, महादेव शेळके, लखनगावचे ज्ञानोबा गोडभरले आदी शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरविला आहे़ ४भादा सर्कलमधील शेकडो शेतकऱ्यांनी खरीप हंगाम गेल्याने आतापासूनच रबीची तयारी सुरू केली आहे़ चांगला पाऊस झाल्यास ज्वारी, गहू, हरभरा पेरण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे़ ४ज्या शेतकऱ्यांनी खरीपावर नांगर फिरविला ते शेतकरी कोथिंबीर किंवा अन्य पिकाची लागवड करणार असल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, तालुक्यात विविध ठिकाणी दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत़ पाणीटंचाईची समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी त्रस्त आहे़
९८ हजार हेक्टर्सवरील पिके धोक्यात
By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST