सुरेश चव्हाण
कन्नड : प्रत्येक गावाचे वर्षानुवर्षे कोणते ना कोणते वेगळे वैशिष्ट्य असते आणि त्यावरच त्या गावाची ओळख ठरते. मात्र, चिकलठाणच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत, या व्यवसायातून गावाला एक नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे. दुधाने येथील शेतकऱ्यांच्या जीवनात विविध रंग भरले असून, अर्थकारणाला कलाटणी मिळाली आहे.
दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. यातून दूध, दही, ताक, लोणी, तूप हे पदार्थ मिळतात. त्याशिवाय मिळणारे शेणखत शेतीमध्ये सुपीकता आणते. या पारंपरिक व्यवसायाला चिकलठाणच्या तरुण शेतकऱ्यांनी सुधारित आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन गावाचे अर्थकारण बदलून टाकले आहे. चिकलठाणची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार असून, येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. हे गाव पूर्वी उसाचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीने गावची ओळख पुसली गेली. निसर्गाचा लहरीपणा, शेतीला लागणारा खर्च व मिळणारा भाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतीव्यवसाय तोट्यात जाऊ लागला. यामुळे गावातील सुशिक्षित बेकार तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. पंजाब व हरियाणा राज्यातून तसेच सातारा, कोल्हापूर, लोणी-प्रवरा येथून जास्त दूध देणाऱ्या गायी खरेदी केल्या. गायींना चारा म्हणून मुरघास दिला जातो. मुरघास तयार करताना मक्याच्या चाऱ्याच्या कुट्टीत मिठाचा वापर करतात. दिवसभरात एका गायीला ५० किलो मुरघास दिला जातो. ५० टक्के मका, ३० टक्के गहू व २० टक्के सोयाबीन यांचा भरडा सकाळ व संध्याकाळ मिळून ७ किलो दिला जातो. दुधाळ गायीची झीज भरून निघण्यासाठी मिनरल मिक्स्चरचा वापर केला जातो. गायींना डासांचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यात फॅन बसविण्यात आलेले आहेत. गायींच्या आरोग्यासाठी पशुचिकित्सकांचा सल्ला घेतला जातो.
चौकट
दररोज बारा हजार लिटर दूध संकलित
सध्या गावात २० मुक्तगोठे आहेत. प्रत्येक गोठ्यामध्ये सुधारित प्रजातींच्या ५ ते २० पर्यंत गायी आहेत. २० लिटरपासून ४२ लिटरपर्यंत दूध देणारी गाय येथे आहे. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. गावात ९ दूध संकलन केंद्रे आहेत. दररोज १ लिटर ते ३७५ लिटर दूध संकलन केंद्रावर टाकणारे शेतकरी आहेत. गावातून दररोज सुमारे १२ हजार लिटर दूध संकलित केले जाते. एका दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादित करणारे जिल्ह्यात असे दुसरे गाव नाही.
कोट...
भाववाढ होण्याची आवश्यकता
सध्या दुधाचा भाव प्रतिलिटर २२ रुपये असल्याने सध्या हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे भाववाढ होण्याची गरज आहे. शासनाने एफआरपी लावण्याचा निर्णय घेतल्याने दुग्धोत्पादक आशादायी आहेत.
- सुधीर चव्हाण, शेतकरी
फोटो : चिकलठाण येथे असलेला मुक्त गोठा.
270621\27_2_abd_74_27062021_1.jpg
चिकलठाण येथे असलेला मुक्त गोठा.