वैजापूर : तालुक्यात दर महिन्याला होणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पलाही दलालांचा विळखा पडला आहे. त्यामुळे परवाना, पासिंग करण्यासाठी येथे वाहनधारकांना दलालांचीच मदत घ्यावी लागते. कमी किंमतीत होणारी कामे दलाल अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन करत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कॅम्पमधील दलालांना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.वैजापूरच्या मासिक कॅम्पमध्ये नवीन वाहनांची पासिंग, वाहन चालविण्याचा कच्चा आणि पक्का परवाना, नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन आदी कामे केली जातात. डेपो रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दर महिन्याच्या दुसºया आठवड्यात आरटीओ कॅम्प आयोजित केला जात असल्यामुळे तालुक्यातील १६४ गावातील नागरिकांना आरटीओशी संबंधित इतर कामे येथे करणे सहज शक्य झाल्याने शहरवासी आणि तालुक्यातील गरजूंना एक चांगली सुविधा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र दलालांचा सुळसुळाट वाढल्याने उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.कॅम्पच्या ठिकाणी १५ ते २० दलालांनी चक्क टेबल, खुर्च्या लावून आपली दुकानदारी सुरू केली आहे.दर महिन्याला आरटीओद्वारे काही शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करून काही कक्षात कामकाज सुरू असते. पण त्यांच्यासोबत दलालांची गरज काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सार्वजनिक विभागही आरटीओ वगळता इतर एजंट-दलालांना विश्रामगृह परिसरात प्रतिबंध का घालत नाहीत, हाही प्रश्न आहे. आरटीओ कॅम्पमध्ये पारदर्शक सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.‘बंधू’कोण?वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दर महिन्याला एजंटकडून कलेक्शन करण्यासाठी औरंगाबादचा ‘बंधू’ म्हणून परिचित असलेला एजंट येत असतो. या एजंटचा थाटबाट आरटीओपेक्षा भारी आहे. वाहन चालविण्याचे ट्रायल घेणे, कागदपत्र तपासणे, एजंटकडून कलेक्शन जमा करण्याचे काम हा ‘बंधू’ करत असतो. सध्या आॅनलाईन प्रणालीच नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. आरटीओची आॅनलाइन सेवा बºयाचदा आॅफलाईन जात असल्याने तालुक्यातील नागरिकांना नाईलाजस्तव कॅम्पमध्ये दलालाची मदत घ्यावीच लागते.
वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दलालांची ‘दबंगगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:21 IST