औरंगाबाद : सव्वा तासात गणपत्यथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे पठण करून ब्रह्मवृंदांनी शिस्त, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविले. वेदाचार्यांनी चार वेदांचे पठण करून मंगलमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर एका सुरात गणपत्यथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील ४ वर्षांपासून गणेशोत्सवातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपत्यथर्वशीर्षाचे पठण करण्यात येत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे युवकांची संख्या वाखाणण्याजोगी ठरली. सोमवारी सायंकाळी सप्तपदी मंगल कार्यालय ब्रह्मवृंदांनी भरून गेले होते. प्रारंभी गणपतीचे पूजन करण्यात आले. यानंतर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. धर्मपीठावर वेदशास्त्रसंपन्न श्रीराम धानोरकर, अशोक देव, जीवनगुरूभोगावकर यांच्यासह महिला प्रतिनिधी नलिनी वझरकर व जयश्री कुलकर्णी विराजमान झाल्या होत्या. प्रारंभी, चार वेदांचे पठण करण्यात आले. यानंतर शांतीपाठ म्हणून बरोबर ५ वाजता सामूहिक आवर्तन म्हणण्यास सुरुवात झाली. प्रत्येकाच्या हातात गणपत्यथर्वशीर्षाची छापील प्रत देण्यात आली होती. अथर्वशीर्ष हे छोटेसे उपनिषद. सगुण साकार अशा गणेशमूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकारापर्यंत कसे पोहोचायचे ते अथर्वशीर्ष आपल्याला सांगते. उपनिषदातून गणपतीची आराधना करण्याचे माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या गणकऋषींनाही यावेळी वंदन करण्यात आले. प्रारंभी विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यशस्वीतेसाठी रत्नाकर कुलकर्णी, रमेश पाथ्रीकर, प्रकाश वझरकर, कुलदीपक देशपांडे, अरविंद मोदी, अवधूत नाकाडे, अनुराधा पुराणिक, वसंतराव कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
अथर्वशीर्षातून संस्कृतीदर्शन
By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST