औरंगाबाद : कोरड्या दुष्काळामुळे चिंताग्रस्त असलेल्या लाडसावंगी गावकऱ्यांवर एका रात्रीत ओल्या दुष्काळाचा सामना करण्याचे विघ्न आले आहे. गुरुवारी रात्री पडलेल्या धुवाधार पावसामुळे शुक्रवारी दुधना नदीला पूर आला आणि गावातील परिस्थिती अचानक बदलली. शनिवारीही गावकरी बाबूवाडी धरण फुटल्याच्या अफवेने सैरभैर पळत होते. अनेक जण परिसरातील शेतातून घरगुती भांडी-कुंडी गोळा करीत होते. कालपर्यंत पाणी-पाणी करणाऱ्या या गावकऱ्यांवर आज अचानक पुरामुळे ही स्थिती उद्भवली आहे.दुधना नदीला आलेल्या पुरामुळे लाडसावंगी मंडळातील जवळपास सहा गावे बाधित झाली आहेत. पुराचा फटका तसा दहा गावांना बसला आहे. लाडसावंगीसह सय्यदपूर, शेलूद, चारठा, हातमाळी, औरंगपूर, कासनापूर, नायगव्हाण, अंजनडोह आदी गावांतील ९०० हेक्टरवरील पिके गाळाखाली गेली आहेत. एकट्या लाडसावंगीतील २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कापसाला आलेल्या धोड्या चिखलात माखल्या आहेत. मका भुईसपाट झाला आहे. अंदाजे शंभर दुकाने, दीडशे ते दोनशे घरांचे नुकसान झाले असून, महसूल खात्याने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी लोळगे, वैशाली कांबळे, भाग्यश्री मिटके, मीना सुक्ते, भारती माधनकर हे पाच तलाठी, मंडळाधिकारी हरिश्चंद्र तरटे व ग्रामसेवक मोकाडे हे गावात लोकांच्या तक्रारी ऐकत पंचनाम्याचे काम करीत होते. ...अन् सर्वच घाबरलेभाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी लाडसावंगीत नुकसानीची पाहणी केली. यावेळी लोकांनी मदत काय मिळते याकडे नजरा लावल्या; परंतु त्यांनी ठोस काहीच आश्वासन न दिल्यामुळे सर्वांची निराशा झाली. दरम्यान, ते लाडसावंगीतून सय्यदपूरकडे पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांना राऊत वस्तीवरील महिलांनी अडविले व मदतीची मागणी केली. याचवेळी गावात बाबूवाडी धरण फुटल्याची अफवा पसरल्यामुळे सर्व गाव सैरावैरा पळत सुटले होते. ही अफवा खा. दानवे यांच्या कानी आल्यावर त्यांनीही पाहणी अर्ध्यावर सोडून निघून जाणे पसंत केले.लाडसावंगी गावाशेजारी राऊत व जाधव या वस्त्या आहेत. या दोन्ही शेतवस्त्यांना पुराने वेढले होते. घरदार सोडून या वस्त्यांवरील लोक नातेवाईकांकडे गेले होते. घरातून वाहून गेलेले साहित्य शनिवारी हे लोक शेतातून गोळा करीत होते. राऊत वस्तीवरील गोविंद राऊत, एकनाथ राऊत, कैलास राऊत, सीताराम ढोके, सुखदेव राऊत, नामदेव राऊत, कमलाकर राऊत, ज्ञानेश्वर राऊत, बबन राऊत, लक्ष्मण गवारे, भानुदास शेळके, पांडुरंग राऊत यांच्या शेताचे सर्वच्या सर्व नुकसान झाले आहे. त्यांच्या शेताजवळ असलेला दुधना नदीवरील बंधारा फुटल्यामुळे नदीचे पात्र शेतातून वाहत आहे. नदीकाठावर शेती असल्याने मका व कापूस ही पिके चांगल्या अवस्थेत होती. मात्र, आता संपूर्ण पिके आडवी झाली असून चिखलात माखली आहेत. या लोकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.दुधना नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणलाही जोरदार ‘शॉक’ लागला. मोठ्या लाईनचे जवळपास २० ते २५ खांब, लहान लाईनचे ४० ते ५० खांब व दोन रोहित्र (डी.पी.) वाहून गेले आहेत. यामुळे एक रात्र तब्बल २२ गावे अंधारात होती. शनिवारी कार्यकारी अभियंता ग्रामीण नामदेव गांधले, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण-२ दीपक तुरे व अभियंते भिवसाने, खिंडरे, हरकळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी १८ गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. पडलेल्या खांबांचा वीजपुरवठा खंडित करून या गावांपुरता प्रवाह सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून ज्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही अशी पाच गावे अंधारात राहणार आहेत. पुरामुळे लाडसावंगी येथील सबस्टेशन गुडघ्याइतक्या पाण्यात होते.लाडसावंगी- सय्यदपूर रस्त्यावरील दुधना नदीवर दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सय्यदपूरशी वाहतूक संपर्क बंद झाला आहे. गावकऱ्यांना आता पाण्यातून वाट काढीत जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. भविष्यात पाणी कमी झाल्यानंतरही वाहतूक व्यवस्था सुरू होते की नाही, हा प्रश्नच आहे. एका रात्रीत सर्व चित्र बदलून गेले...लाडसावंगी हे अंदाजे २० ते २५ हजार लोकवस्तीचे गाव. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. बाजारपेठेचे गाव असल्याने काहींना व्यवसायाची आवड. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे गावकरी दुष्काळाचा सामना करीत होते.तसा दुष्काळ गावाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अनेक योजना राबवूनही गावात प्यायच्या पाण्याचा ठणठणाट कायमच आहे. दुष्काळात सरकार किती मदत करणार, यंदा खरीप हंगामात फारसे काही हाती लागणार नसल्याने रबीचे काय होते, असा विचार गावकरी करीत असताना अचानक धुवाधार पाऊस येतो अन् एका रात्रीत सर्व चित्र बदलून जाते. कालपर्यंत पाणी-पाणी करणारे हे गाव आज पाण्याला पाहून सैरभैर पळत होते. अनेक जण तर नशीब चांगले म्हणून दिवसा पूर आला, जर रात्री पूर आला असता तर झोपेत वाहून गेलो असतो, या विचारानेच नि:शब्द होतात.
शेकडो हेक्टरवरील पिके गाळात
By admin | Updated: September 20, 2015 01:12 IST