पैठण : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने काल गारमाथा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील डोंगर स्थानिक ग्रामस्थ व वारकऱ्यांच्या मदतीने पार केला. या डोंगरातून पालखीसाठी मार्ग नसल्याने हाटकरवाडीचे ग्रामस्थ व वारकऱ्यांना हाताने पालखी ओढावी लागली.नाथांच्या पालखी मार्गाचे काम व्हावे, अशी मराठवाड्यातील वारकऱ्यांची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. पैठण ते पंढरपूर दरम्यान अनेक ठिकाणी नाथांच्या पालखीसाठी कच्चे रस्तेसुद्धा उपलब्ध नाहीत. यामुळे दिंडीत सहभागी झालेल्या महिला व वृद्ध वारकऱ्यांना मोठ्या यातना सोसाव्या लागतात. पाटोदा तालुक्यातील धनगरवाडी, हाटकरवाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी कच्चा रस्तासुद्धा नाही. काल दि. २६ रोजी हाटकरवाडीच्या ग्रामस्थांनी पालखी रथ हाताने ओढून पालखीस पार केले. हा डोंगरमाथा चढताना वारकऱ्यांना यातना सोसाव्या लागल्या. (वार्ताहर)
नाथांच्या पालखीने केला गारमाथा डोंगर पार
By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST