लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जून महिन्यात झालेल्या पावसावर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरु शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन लाख शेतकरी असून या सर्व शेतकरी कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे, पावसाळा सुरु होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरुन अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पेरण्याही सुरु झाल्या. काही शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पहिल्या दमदार पावसानंतर अधुन-मधून पावसाचा शिडकावा झाला. परंतु, पिकांना पोषक पाऊस झाला नाही. १५ दिवसांपासून तर हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून पाऊस चक्क गायबच झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मूबलक पावसाची गरज आहे. परंतु, पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्या ऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरुन आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ- दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर ओढवू शकते.
जिल्ह्यातील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:13 IST