विकास राऊत, औरंगाबादशहरातील ९९ वॉर्डांत राहणाऱ्या गुन्हेगार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम पोलीस विभागाने हाती घेतली आहे. शुक्रवारी दोन पोलीस उपनिरीक्षकांनी पालिकेच्या निवडणूक विभागाकडे संगणकीय मतदार यादीची मागणी केली. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही तडीपार व पोलीस दप्तरी ‘वाँटेड’ असलेल्या गुन्हेगारांनी मतदान केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य शहरात असल्याचे पोलिसांना वाटत असून, आगामी विधानसभा निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी पोलिसांनी मतदार यादीसाठी थेट मनपाला साकडे घातले आहे. त्या यादीच्या आधारे पोलीस गुन्हेगार मतदारांचा शोध घेणार आहेत. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून तशा सूचना आल्याने झोननिहाय यंत्रणा कामाला लागली आहे. पालिकेकडे २०११ च्या जनगणनेनुसार यादी नाही. २०१० ची यादी मनपाकडे उपलब्ध आहे. ती यादीही एका खाजगी संस्थेकडून पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांना जी माहिती हवी आहे, त्यामध्ये सध्या तरी काही अडथळे असल्याचे दिसते. शहराची लोकसंख्या महापालिकेने २०११ च्या जनगणनेनुसार २०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी ११ लाख ७५ हजार ११६ इतकी लोकसंख्या ग्राह्य धरली आहे. त्या धर्तीवरच पालिकेची प्रभाग रचना होणार आहे. शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांत सुमारे आठ लाख मतदार असतील. ९०० च्या आसपास मतदान केंदे्र आहेत. या सगळ्या केंद्रांवरील मतदारांची संगणकीय यादी पोलिसांना हवी आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले की, काही गुन्हेगारांचा शोध घ्यायचा आहे. ते गुन्हेगार सध्या आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की नाही, याची पाहणी करायची आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही काही आदेश आलेले आहेत. ४संगणकीय यादी मिळाली असती तर पोलिसांकडील गुन्हेगारांची नावे संगणकात टाकून गुन्हेगारांचा शोध घेता आला असता. मनपाने त्या याद्या काही दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. गुन्हेगार किती आहेत, त्यांचा आकडा पोलीस सूत्रांनी सांगितला नाही. मनपाकडे वॉर्डनिहाय संगणकीय यादी उपलब्ध नाही. एका खाजगी एजन्सीकडून मनपाने २०१० मध्ये मतदार याद्यांचे काम करून घेतले होते. त्या एजन्सीने पालिकेला फक्त मतदार याद्या भागनिहाय मुद्रित करून दिल्या. मात्र, संगणकीय कॉपी पालिकेला दिली नाही. त्यामुळे मनपाने लाखो रुपये देऊन फक्त मुद्रित याद्या घेतल्या.४ संगणकीय डाटा न घेतल्यामुळे यावेळी पुन्हा नव्याने मतदार याद्यांची पुन्हा रचना पालिकेला करावी लागणार आहे. ज्या एजन्सीने याद्यांचे काम केले होते, त्यांनी याद्या सोयीनुसार अनेक इच्छुकांना विकल्याने याद्यांचा बाजार फोफावत गेला. २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ मध्ये सापडत नाही. त्यातच नकाशे ब्लॅक अॅण्ड व्हाईट करण्यात आले आहेत. ४नकाशे रंगीत करावे लागणार असल्यामुळे मनपा निवडणूक विभागाचे काम आणखी वाढले आहे. जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अडचणी येत आहेत. ४१८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला.
गुन्हेगार मतदार शोधणार
By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST