गेवराई : उत्तरप्रदेशातील झांशी येथे गेवराई येथील जवानाचा गुरुवारी अपघाती मृत्यू झाला होता. या जवानाचे पार्थिव रविवारी येथे आणण्यात आले. सकाळी दहा वाजता चिंतेश्वर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.हृदयनाथ बाबूराव माने (वय ३३) हे बारा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. चारचाकी वाहनातून दारुगोळा घेऊन जाताना समोरुन येणाऱ्या वाहनाने त्यांच्या वाहनास उडविले. यात हृदयनाथ हे गतप्राण झाले. जायकवाडी वसाहतीतील निवासस्थानापासून फुलांनी सजविलेल्या वाहनात पार्थिव ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आ. अॅड. लक्ष्मण पवार, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष महेश दाभाडे, शिवसेनेचे अजय दाभाडे, मनसेचे राजेंद्र मोटे, समाधान मस्के, राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘अमर रहे.. अमर रहे...’ च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. सैन्य दलातील जवानांनी मानवंदना दिली. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार कल्याण जगरवाल यांनी पुष्पचक्र अर्पण केले. (वार्ताहर)
‘त्या’ जवानावर गेवराईत अंत्यसंस्कार
By admin | Updated: April 13, 2015 00:49 IST